डोंबिवली : ठाणे जिल्हयातील डोंंबिवली नजीकच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या निळजे गावातील जमीनमालक मृत झाले असल्याचे माहिती असूनही निळजे गावातील दोन ग्रामस्थांनी मिळून मृत व्यक्तिच्या नावाने बनावट सात/बारा आणि फेरफार उतारे तयार केले. त्या आधारे बनावट दस्त नोंंदणी करून मृताची जमीन आपल्या मालकीची असल्याचे दाखवून त्या जमिनीमधून गेलेल्या विकास योजनेतील रस्त्याच्या भरपाईची ११ कोटीची रक्कम लाटल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या घटनेनंतर २७ गावांत एकच खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणात महसूल विभागातील अधिकारी आणि दस्तऐवज विभागातील अधिका-यांचे रॅकेट असून या सगळयांची चौकशी करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

गेल्या महिन्यात घडलेला हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार आता उजेडात आल्यानंतर मृताच्या नातेवाईकाने या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या फसवणूक प्रकरणात मृत व्यक्तिचे नातेवाईक निळजे गावातील रहिवासी सुरेश आंबो खुटारकर (६७) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. उत्तम गणा पाटील आणि सुदर्शन रोहिदास पाटील अशी आरोपींंची नावे आहेत. हे दोघेही निळजे गावातील रहिवासी आहेत.

या संदर्भात पोलिसांंनी सांंगितले की, तक्रारदार सुरेश आंबो खुटारकर यांचे वडील आंबो पांडू खुटारकर हे २०११ मध्ये मयत झाले आहेत. आंबो खुटारकर यांची निळजे गावाजवळ हेदुटणे रस्त्यावर ३० गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. ही जमीन रस्ते विकास योजनेने बाधित झाली आहे. या जमिनीचा शासनाकडून ११ कोटीचा मोबादला मिळणार होता. या जमिनीचे वारस सुरेश खुटारकर आहेत. या जमिनीचा शासनाकडून मोबदला मिळणार असल्याने निळजे गावातील ग्रामस्थ आरोपी उ्तम पाटील, रोहिदास पाटील यांनी तक्रारदार सुरेश खुटारकर यांना काहीही कळणार नाही अशा पध्दतीने त्यांच्या वडिलांच्या नावे जमीन विक्रीचा व्यवहार करणारी बनावट कागदपत्रे तयार केली. यामध्ये तहसीलदार कल्याण, शेत जमीन न्यायधिकरण हे लिहून देणार आणि मयत आंंबो खुटारकर हे लिहून घेणार असा बनावट दस्तऐवज गेल्या महिन्यात तयार करण्यात आला.

आंबो खुटारकर हे १४ वर्षापूर्वी मयत झाले असताना त्यांच्या नावे गेल्या महिन्यात ते हयात असल्याचे दाखवून आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली. ही जमीन खरेदी विक्रीची कागदपत्रे कल्याणच्या दस्त नोंदणी कार्यालयात दाखल करून ती नोंंदणीकृत करून घेतली. आंबो खुटारकर हयात नाहीत हे माहिती असूनही आरोपींंनी त्यांच्याकडून आपण जमीन खरेदी केली आहे असे दाखवून त्या जमिनीच्या सात/बारा आणि फेरफारवर स्वत:ची नावे चढवली. ही कागदपत्रे आंंबो यांच्या जमिनीला शासकीय मोबदला मिळणार होता, त्या महसूल कार्यालयाकडे दाखल केली. या जमिनीचे मूळ वारस सुरेश खुटारकर यांंना काहीही कळून न देता खुटारकर यांच्या जमिनीतून रस्ते भरपाईसाठी मिळणारा ११ कोटीचा मोबदला परस्पर काढून घेतला. सुरेश यांना आपल्या जमिनीतून शासकीय रस्ता सुरू असताना आपणास मोबदला का मिळाली नाही म्हणून त्यांंनी महसूल कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला. सुरेश यांंनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!