समाजाचे मजबूत संघटन ही काळाची गरज : पंकजा मुंडे

नाशकात वंजारी समाज भवनचे  पंकजा मुंडे यांच्या हस्ते थाटात लोकार्पण

मुंबई (अजय निक्ते) : वंजारी समाज बांधवांच्या विविध लोकोपयोगी कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या वंजारी समाज भवनचे लोकार्पण राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज शहरात मोठ्या थाटात पार पडले. वंजारी समाजाने हुंड्यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना फाटा देऊन एकसंघ समाज घडवावा असे आवाहन त्यांनी यावेळी समाज बांधवांसमोर बोलतांना केले.

वंजारी समाज उत्कर्ष मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीने नाशिक येथे सर्व सोयी सुविधांनी युक्त असे वंजारी समाज भवन बांधण्यात आले असून त्याचे लोकार्पण  पंकजाताई मुंडे यांनी आज केले. आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी वंजारी समाज बांधवांच्या वतीने  पंकजाताई मुंडे यांचे जोरदार स्वागत झाले. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, समाजामध्ये आज उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, ही अतिशय कौतुकाची बाब आहे परंतू आजही विवाहाच्या कार्यक्रमावर होणारा मोठा खर्च होतो तो टाळला पाहिजे. समाजाने एकत्रित येवून हुंड्यासारख्या प्रथा मोडीत काढाव्यात. सामुदायिक विवाह सोहळे करण्यावर भर देवून इतरांसमोर आदर्श ठेवावा असे सांगून या नवीन वास्तूचा उपयोग विधायक कार्यासाठी व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजाच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी मी नेहमीच पाठिशी खंबीरपणे उभी आहे, तथापि बदलत्या काळाबरोबर समाज बांधवांनी एकसंघ होण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास जि. प.अध्यक्षा शीतल सांगळे, उद्योजक एस. टी. सानप, कावेरी घुगे, उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष मारूती उगले आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!