मुंबई, दि. १६ : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. १९ एप्रिल  रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १०,६५२ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत ९५,५४,६६७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) २१,५२७ तर कंट्रोल युनिट (सीयु) १३,९६३ आणि १४,७५५ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून ९७ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

 मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत  चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके उपस्थित होते.

 यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण ९७ उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन  चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

 मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही  रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा

८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह    मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या  ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे एकूण ९४१६ मतदार तर १२ डी या अर्जाद्वारे ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे एकूण ६,६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

 मतदानाच्या  ४८ तास आधी प्रचारास बंदी

 मतदान संपण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी पाचही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

 प्रतिबंधात्मक कारवाई

            कायदा व सुव्यवस्थांतर्गत ११ एप्रिलपर्यंत ४३,८९३ शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून ७२३ शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत ७०,९६७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  

        राज्यामध्ये दि. १ मार्च ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ३९.१० कोटी एकूण रोख रक्कम तर २७.१८ कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू ६३.८२ कोटी रुपये, ड्रग्ज २१२.८२ कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत ७८.०२ कोटी रुपये अशा एकूण ४२१.४१ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१८७२२ तक्रारी निकाली

               १६ मार्च ते १३ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या २३३७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील २३३१ (९९.६३ %) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील १९०१८ तक्रारीपैकी १८७२२ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!