मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ रविवार १८ जूलैपासून भरुन‌‌ वाहू लागला आहे‌. गेल्यावर्षी ५ ऑगस्‍ट २०२० ला तलाव पूर्ण भरुन वाहू लागला होता. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे.

बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

विहार तलावाबाबत

√ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
√ या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.
√ या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
√ या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.
√ तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो.
√ हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *