शहरातील वनीकरणावर द्या भर, करा आपलं स्वच्छ-सुंदर हरित शहर…..
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व शहरवासियांना आवाहन
मुंबई (अजय निक्ते) : राज्यात वन विभागाने लोक सहभागातून  महावृक्ष लागवड मोहिम हाती घेतली असून,  या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावं,  असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशा आशयाचे  पत्र राज्यातील सर्व नगरपंचायती , नगरपरिषदा, महानगरपालिकांना, नगराध्यक्ष, महापौर, आयुक्त , मुख्याधिकारी यांना पाठवले आहे. याच पत्रात त्यांनी शहरवासियांना देखील  वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याची साद घातली आहे.

भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून  राज्याच्या महावृक्ष लागवडीचे फलित दिसून येत असल्याचे सांगतांना त्यांनी विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशात मिळवलेल्या प्रथम स्थानाची माहिती दिली आहे. पत्रात ते म्हणतात की, महाराष्ट्रराज्य हे वनेत्तर क्षेत्रामधील वृक्ष आच्छादनामध्ये देशामध्ये अग्रगण्य राज्य  ठरले आहे. राज्यामध्ये कांदळवन तसेच बांबू क्षेत्रात भरघोस वाढ झाली आहे.  राज्यामध्ये घनदाट जंगल म्हणजे ७० टक्क्यांपेक्षा जास्त घनतेची जंगले यामध्ये ५१ चौ.कि.मी ची वाढ दर्शविली आहे.

भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२  चौ. कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ कि.मी ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे.  २०१५ मध्ये राज्यात  एकूण जलव्याप्त क्षेत्र १११६ चौ कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून १५४८ चौ.कि.मी इतके झाले आहे. जल व्याप्त क्षेत्रातील ही वाढ ४३२ चौ कि.मी इतकी आहे.

राज्यात  २०१५ मध्ये बांबू प्रवण क्षेत्र ११४६५ चौ.कि.मी होते. ते २०१७ मध्ये १५९२७ चौ.कि.मी इतके झाले म्हणजे २०१५ च्या तुलनेत राज्यातील बांबू क्षेत्रात ४४६२ चौ.कि.मी म्हणजे ४ लाख ४६ हजार २०० हेक्टने वाढ झाली आहे. राज्यात वृक्ष लागवडीला मिळत असलेला मोठा जनाधार या सर्व क्षेत्रातील यशामागचे कारण आहे.

महाराष्ट्रात झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. शहरांमधील लोकसंख्या वाढत आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरांचा श्वास कोंडतो आहे. पाणी, ध्वनी आणि हवा प्रदुषण यासारख्या प्रश्नांवर आपल्याला मात करावयाची आहे. त्यासाठी आपलं शहर स्वच्छ-सुंदर आणि हरित असणं अगत्याचं आहे.  शहराचं सौंदर्य वाढवून शहरं पर्यावरणस्नेही करायची असतील तर  शहरांमध्ये मोठ्याप्रमाणावर वृक्ष लागवड होणे, वृक्ष जगवले जाणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला असून शहरांच्या शाश्वत विकासासाठी पाऊले उचलतांना त्याला वनीकरणाची जोड देण्याचे धोरण विभागाने निश्चित केले आहे. कुठले झाड कुठे लावायचे, रोपं कुठून मिळवायची, ती कशी लावायची या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन वन विभाग करत आहे. येत्या जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवड होणार आहे.  शहरातील नागरिकांनीही पुढे येऊन स्वंयस्फुर्तीने  वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, आपल्या भागात वृक्ष लागवडीचे नियोजन करावे आणि लावलेली वृक्ष जगतील याची काळजी घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी या पत्रातून व्यक्त  केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!