वर्ष अखेर महाराष्ट्र डिजीटल होणार : रविंद्र चव्हाण

नवी दिल्ली :  राज्यातील सर्व ग्रामपंचायती, आरोग्य केंद्र, व सर्व शाळा डिजीटल करण्यासाठी महाराष्ट्राने  पुढाकार घेतला असून वर्ष अखेर राज्य डिजीटल होईल, असा विश्वास, राज्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र  चव्हाण यांनी व्यक्त केला.   चव्हाण यांनी आज महाराष्ट्र केंद्राला भेट दिली.  त्यावेळी  झालेल्या चर्चेत राज्यमंत्री  चव्हाण  यांनी ही माहिती दिली. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  चव्हाण यांचे पुष्पगुच्छ तसेच कार्यालयातील प्रकाशने भेट देऊन स्वागत केले.  यावेळी दै. सामना चे ब्युरोचीफ निलेश कुलकर्णी, आवाज इंडिया या वेबपोर्टलचे संपादक विनीत वाही, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

चव्हाण यांनी सांगितले की, ‘भारतनेट’ प्रकल्पातंर्गत महाराष्ट्रातील 12 हजारहून अधिक ग्रामपंचायती ब्रॉडबॅन्डने जोडल्या गेल्या आहेत.  महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायती, आरोग्य केंद्र आणि शाळा वर्ष अखेर इंटरनेट ने जोडल्या जातील असेही ते म्हणाले. देशाच्या राजधानीत असणारे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातुन व्यापक प्रसिद्धी दिली जात  असल्याचे कौतुकही  चव्हाण यांनी यावेळी केले. कार्यालयातील समाज माध्यमाव्दारे महाराष्ट्राच्या सांस्कृतीक, सामाजिक आणि महाराष्ट्र शासनाच्या जनसपंर्क व प्रसिद्धीचे काम कार्यालयाव्दारे अतिशय चांगल्या त-हेने केले जात असल्याची प्रशंसा त्यांनी केली.  कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारी विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती चव्हाण यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *