ठाणे, दि.२२ : मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठीजास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पर्यवेक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेची अंमलबजावणी विदर्भ व मराठवाड्यातील १७ जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच, उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये राबविण्यात येत होती. ही योजना राज्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या नविन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येणार आहे.

‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतक- यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. लाभार्थ्याची पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर शेतक-यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *