सोशल नेटवर्किंग साईटवरील मेसेज, खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : समाजात तेढ निर्माण करणारे संदेश व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर पसरवण्यात येत आहेत. त्यांची खात्री न करताच इतरांना फॉरवर्ड करू नका, असा सावधानतेचा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना दिला आहे. नवी दिल्लीत सशस्त्र सीमा दलाच्या गुप्तचर शाखेचे उद्घाटन सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सोशल मीडिया, विशेषतः व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या अशा प्रकारच्या बोगस वृत्तांबाबत जवानांनी सतर्कता बाळगावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

देशात सशस्त्र सीमा दलाची गुप्तचर शाखा पहिल्यांदाच सुरू होत आहे. या शाखेच्या माध्यमातून नेपाळ सीमेवर होणारी तस्करीच नाही, तर देशाविरोधी कारवाया करणाऱ्यांवरही करडी नजर राहणार आहे. गेल्या वर्षी सशस्त्र सीमा दलाने सीमेवरील कारवाईत ३०६ कोटी रुपये किंमतीचे अवैध साहित्य जप्त केले आहे. तसेच पाच हजारांहून अधिक तस्कर आणि नक्षलवाद्यांना अटक केली आहे. तसेच या वर्षी केवळ आठ महिन्यांत ५७० कोटी रुपये किंमतीचे अवैध साहित्य जप्त करून ४६२८ जणांना अटक केली आहे, अशी माहितीही सिंह यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *