पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ते १०० वर्षांचे होते.  पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात आला.  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अभिनेते तसंच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

शब्दात मांडता येणार नाही अस दु:ख : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील,” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

*”असा अलौकिक शिवआराधक होणे नाही : उध्दव ठाकरे

पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केलीय . शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहीण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा शोक मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यकत केलाय.


साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला : शरद पवार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला अशी श्रध्दांजली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. आपल्या पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीला अत्यंत साध्या भाषेत मांडण्यासाठी आणि इतिहासाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी व्याख्यानं घेतली आणि या विषया संदर्भातली आस्था नव्या पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.


 एक अध्याय पडद्याआड :   *उपमुख्यमंत्री अजित पवार 

 “ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची  मोठी  हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.  पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.”  अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

राज ठाकरेंनी घेतले बाबासाहेबांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी समजताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात दाखल झाले. राज ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. बाबासाहेब आणि राज ठाकरे यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं. राज ठाकरे यांची बाबासाहेबांवर नितांत श्रद्धा होती. जेव्हा कधीही बाबासाहेब पुरंदरे हे राज ठाकरे यांची आठवण काढत तेव्हा-तेव्हा राज ठाकरे हे विलंब न करता थेट पुणं गाठायचे. बाबासाहेबांच्या निधनानंतर ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली.

————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *