मुंबई दि 28: मुंबई महानगराच्या वाहतूक आराखड्यात सार्वजनिक वाहतूकीचे स्थान मोठे असून सार्वजनिक वाहतूक दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा असल्याचे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले. एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास 2 या अंतिम अहवालाचे प्रकाशन आज मुख्यमंत्र्यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील भविष्यातील परिवहन व्यवस्थेसंदर्भात सूचना केल्या.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, एमएमआरडीएच्या कामांना अधिक गती देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल. शहरांचा विकास करताना आपण चटई क्षेत्र निर्देशांक वाढवून देतो पण रस्ते एकदा बांधले की बांधले, आपण त्यासाठी काही करीत नाही. कुणालाही गर्दीत आपली गाडी चालविण्याची हौस नाही . वाहतूक व्यवस्था ही शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखी असून रस्ते पूर्णपणे खड्डे मुक्त, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीटनेटकी व कार्यक्षम तसेच वेगवान असणे याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. सुविधा वाढवतांना पर्यावरणाला मारू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नागरी सुविधांवर लक्ष द्यावे -एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई आणि मुंबई महानगरच नव्हे तर राज्यात सर्वत्र उत्तम रस्ते असणे यावर प्राधान्य देण्यात आले असून ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी रस्ते खराब होऊ नयेत म्हणून ते काँक्रीटमध्ये बांधण्याचा निर्णय झाला आहे.

ताळमेळ व शिस्त हवी – आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, मुंबई, ठाणे या शहरांची भविष्यात वाढ आता अवघड असली तरी आता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गगनचुंबी अशी उभी आणि उंच वाढ सुरू झाली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास, उपकरप्राप्त इमारतींची पुनर्रचना, म्हाडामार्फत गृहनिर्माण अशा वेगवेगळ्या संस्थांकडून शहरांमध्ये नवीन वसाहती निर्माण केल्या जात आहेत, साहजिकच लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्याला केवळ नवनवीन रस्त्यांचे नियोजन नव्हे तर उत्तम पर्यायी व जोड रस्ते यांचेही नियोजन करावे लागणार आहे. मुंबईत आज 3500 बसेस आहेत पण 10000 बसेस धावू लागतील तेव्हा वाढीव लोकसंख्येचा विचार करून आपण सर्वाना ही सुविधा देण्याचे समाधान मिळेल. याव्यतिरिक्त आपण इलेक्ट्रीक किंवा आणखी कोणते पर्यावरणपूरक इंधन वापरतोय हा देखील कळीचा मुद्दा आहे ही सर्व व्यवस्था शाश्वत असली पाहिजे आणि यात चांगला ताळमेळ व शिस्त हवी तरच ती परिणामकारक ठरेल असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *