किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी चालकांविरोधात कारवाईचा बडगा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने धाडसत्र करून कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आता शाळेच्या आवारात असणा-या पानटप-यांबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.शाळेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पानटप-या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, आधीपासूनच विभागाने कारवाई सुरू केली आहे. आता अन्न व औषध प्रशासनाला कामाचे टार्गेट दिले आहे. राज्यात पनीर, तेल, औषधांमध्ये सुरू असलेल्या गैरकारभारावर कारवाई सुरू केली आहे. तसेच राज्यातील पानटप-यांवरही कारवाई झाली आहे. तसेच शाळेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पानटप-या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असेही मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
गेल्या काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाने गोंदियामध्ये मोठी कारवाई केली होती. बंदी असताना अवैधरीत्या दुकानात साठवून ठेवलेला १३६.७०२ किलो सुगंधित तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासनाने धाड घालून जप्त केला. देवरी येथील दुर्गा चौक बाजार लाईनमधील विशाल किराणा दुकान येथे ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या तंबाखू साठ्याची किंमत एक लाख २७ हजार ६७५ रुपये आहे, तर भिवंडी शहरातून गुटख्याचा साठा जप्त केला होता. भिवंडीत गुटखा विक्री करणा-या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणा-या पानपट्टी चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.

राज्यात पूर्णपणे गुटखा बंदी : १४ विभागांनी एकत्र येऊन राज्यात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अ‍ॅन्टीबायोटीकमध्ये बनावट औषधे बनवल्याचे समोर आले आहे, यावरही कारवाई केली आहे. आम्ही एक बिल पास केले असून ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी गेले आहे, तो कायदा झाला तर आपण आरोपींवर मोठी कारवाई करू शकतो, तसेच आता इथून पुढे ही कारवाई सुरू राहणार आहे. राज्यात गुटखा बंदी पूर्णपणे करायची आहे. यासाठी मी काम करत आहे, असेही मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *