छत्रपती संभाजी नगरः राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मोठ्या प्रमाणावर सापडत असलेल्या कुणबी नोंदींमुळे ओबीसी आरक्षणावर गंडांतर येत असल्याची भूमिका भुजबळांनी मांडली आहे. बीडच्या जाळपोळीच्या घटनेनंतर छगन भुजबळ हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सर्व जाळपोळीची पाहाणी करुन छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषद घेतली. भुजबळ म्हणाले की, सुरुवातीला कुणबी नोंदी कमी सापडत होत्या. त्यानंतर रोजच हजारो नोंदी सापडत आहेत. त्यामुळे कुणबी आरक्षणाला आमचा विरोध आहे असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ पुढे म्हणाले, अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला. परंतु पोलिसांवर हल्ला झाला होता. ७० पोलिस जखमी झाले. त्याचीही चौकशी झाली पाहिजे. गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव आणला जातोय. न्यायमूर्तींनी त्यांचं काम केलं पाहिजे परंतु तेही सर..सर करुन उपोषण सोडायला हात जोडून जात आहे. भुजबळ बोलले की, वातावरण शांत व्हावं म्हणून आमचे काही मंत्री जरांगेंच्या भेटीसाठी जात आहेत. जरांगे थांबायचं नाव घेत नाहीयेत. त्यांना सरसकट आरक्षण पाहिजे. तिकडे तेलंगणामध्ये निवडणुका सुरु आहेत म्हणून समितीला नोंदी तपासता येत नव्हत्या. मात्र जरांगे अडून बसले होते. आता कुणबी प्रमाणपत्र वाटण्यासाठी दुकानं सुरु झाली आहेत. ”ज्या जालन्याच्या मैदानातून शरद पवारांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्याच जालन्यातून आरक्षण संपवण्याचं काम होतं आहे. सध्या राज्यात दहशत पसरवण्याचं काम सुरु असून आमदारांची घरं जाळली जात आहेत. तरीही मंत्री, आमदार जरांगेंना भेटत आहेत. मग या लोकांना ओबीसींची मतं नकोयत का? ” असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *