एनआरसी कंपनीचे दिवाळे काढून देणी देण्यासाठी कामगार उच्च न्यायालयात जाणार

कल्याण (प्रविण आंब्रे): एनआरसी कंपनीचे दिवाळे काढून कामगारांची थकीत देणी देण्यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय मोहोने येथे कामगारांच्या सभेत घेण्यात आला. नालंदा बुध्द विहार येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया इंडस्ट्रियल एंड जनरल वर्कर्स युनियनच्या सभेत हा घेण्यात आला.

यावेळी ऑल इंडिया इंडस्ट्रियल एंड जनरल वर्कर्स युनियनचे राष्ट्रीय नेते सुकुमार दामले, प्रदेश उपाध्यक्ष उदय चौधरी, आ. नरेंद्र पवार, नगरसेवक महेंद्र गायकवाड, प्राजक्ता आदी मंचावर उपस्थित होते. एनआरसी कंपनी संदर्भातील कामगारांच्या मागण्या आमदार पवार यांच्याकडे यावेळी माडण्यात आल्या.

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच कंपनीचे दिवाळे काढून कामगारांची थकीत देणी देण्यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल करणे, ठाणे जिल्ह्यातील बंद कंपन्यांतील सर्व कामगारांना संघटीत करुन त्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, येत्या मार्च महिन्यात विधानसभेवर मोर्चा काढणे आदी महत्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले. त्याला उपस्थित कामगारांनी हात उंचावून पाठींबा दर्शविला. यावेळी आ. पवार, नगरसेवक गायकवाड यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. भाजपचे आमदार असलेल्या आमदार पवार यांनी आपल्या भाषणात कम्युनिस्ट युनियनचे गुणगाण केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *