पनवेल  – नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आज पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.   समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस महेंद्र घरत, भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, कार्यकारिणी सदस्य जे. डी. तांडेल, दशरथ भगत, काँग्रेसचे नेते संतोष केणे, के. के. म्हात्रे, निलेश पाटील, नंदराज मुंगाजी आदी यावेळी उपस्थित होते. 

  यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी  सांगितले कि, या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. असे असताना अचानकपणे १७ एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटनांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
   

   त्यांनी पुढे सांगितले कि, २ जानेवारी २०१५ रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत ही मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालिन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रीमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री  अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता त्यांनी तो तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १९ जून २०१८ रोजी पाठविला. फडणवीस यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे ७ जुलै २०१८ रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते. तसेच अनेक स्थानिक आगरी-कोळी आणि दहा गाव संघटनांच्या वतीने सिडकोकडेही मागणीही केली होती. पण ही लोकभावना लक्षात न घेता सिडकोने आता जी कृती केली आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सिडकोविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
       

  नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास आले नसताना आणि कोरोनाचा बिकट काळ सिडकोच्या ‘एमडी’ नी धिसाडघाईने प्रस्ताव सादर केला. एमडी च्या भूमिकेचा जाहीर निषेधही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  ते म्हणाले की, दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भुमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचले आहे. १९८४ साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व साऱ्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमिन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे साऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होते, अशी माहिती दशरथ पाटील यांनी पत्रकारांना दिली. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी समितीतर्फे दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *