ठाणे (प्रतिनिधी) : एकिकडे कोरोना रुग्ण घटत असल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार व महापालिका स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. मात्र, दुसरीकडे ठाण्यात केवळ कॉन्ट्रॅक्टरचा खिसा भरण्यासाठी कोरोना हॉस्पिटलची उभारणी केली जात आहे, असा गंभीर आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. सध्या ठाण्यात १ हजार ६२० बेड रिकामे आहेत. मात्र, आणखी ३ हजार १४४ बेडची हॉस्पिटले उभारली जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. तर कोरोना आपत्तीच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रात ५ हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात येत असलेल्या व्होल्टास, बोरिवडे आणि बाळकूम येथील रुग्णालयाला माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी भेट दिली. या वेळी भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यासह ठाणे महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.ठाणे महापालिकेच्या बाळकूम, कळवा आणि मुंब्रा येथील हॉस्पिटलच्या बेडची क्षमता १ हजार ८७५ असून, तेथे अवघे २५२ रुग्ण दाखल आहेत. सध्या १ हजार ६२० जागा रिक्त आहेत. बुश कंपनीतील ४४० व बोरिवडे येथील ३०४ रुग्णक्षमतेचे केंद्र उद्घाटनानंतर रुग्ण नसल्याने सुरू झालेच नाही. तर ज्युपीटर हॉस्पिटलनजीकच्या पार्किंग प्लाझामधील १ हजार ३०० बेडचे हॉस्पिटल तयार झाले आहे. मात्र, व्होल्टासच्या जागेवरील आणखी १००४ बेडच्या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या हॉस्पिटलबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही बेड रिकामे आहेत. सध्याच्याच हॉस्पिटलमध्ये क्षमतेएवढे रुग्ण नसताना नव्या हॉस्पिटलचा घाट केवळ कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्यासाठी केला जात आहे, असा आरोप सोमय्या व डावखरे यांनी केला. या माध्यमातून राज्य सरकार व महापालिकेकडील कोट्यवधी रुपयांची लूट केली जात आहे, याकडे दोन्ही नेत्यांनी लक्ष वेधले.

ठाण्यात उभारलेल्या ७ हॉस्पिटल व सेंटरच्या व्यवस्थापनाची कंत्राटे चेंबूर येथील एकाच कंपनीला मिळण्याचा चमत्कारही झाला. या कंपनीबरोबर केलेल्या करारात रुग्ण नसतानाही २५ टक्के रक्कम देण्याची हमी देण्यात आली. त्यामुळे कंत्राटदाराच्या तिजोरीत काम न करताच आयता पैसा जमा होणार आहे. हा चमत्कार केवळ ठाणे महापालिका व महाविकास आघाडी सरकारच करू शकते, असा टोलाही सोमय्या व डावखरे यांनी लगावला. या कंपनीचे फायनान्शियल व मेडिकल ऑडिट करावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. प्रत्यक्ष वैद्यकिय उपचाराचा अनुभव नसून केवळ मेडिक्लेमचा अनुभव असलेल्या एका बीएएमएस डॉक्टरला संबंधित संस्थेने प्रमुख म्हणून नेमले आहे. ठाणे महापालिकेने मोठ्या पगाराची जाहिरात देऊनही डॉक्टर उपलब्ध झाले नव्हते. मात्र, या कंपनीला डॉक्टरसह सर्व कर्मचारी उपलब्ध झाले, हा प्रकार आश्चर्यजनक आहे, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.कोरोना आपत्तीच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रात सुमारे ५ हजार कोटींचा घोटाळा केला. या विषयावर भाजपातर्फे लवकरच काळी पत्रिका काढली जाईल, अशी माहिती माजी खासदार सोमय्या यांनी पत्रकारांना दिली.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *