खमंग बातम्यां पेक्षा खर्‍या बातम्या द्या।
पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमांना कानटोचण्या
महाराष्ट्र दिनमान’च्या वर्धापन सोहळ्यात ‘गेम चेंजर्सं’चा गौरव
ठाणे :   ‘मी काही केले तरी त्याची बातमी होते. अगदी माझी चप्पल आणि फोटोच्या विषयावर मीडियाला मोठे खाद्य मिळते. मात्र अशा खमंग बातम्या देवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा खर्‍या आणि सकारात्मक बातम्या देवून माध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे व्रत जोपासावे, असे आवाहन आणि कानटोचण्या उथळ पत्रकारिता करणार्‍यांना माध्यमांना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शनिवारी   ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मान्यवर मंंडळींच्या उपस्थितीत रंगलेल्या महाराष्ट्र दिनमानच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यात
प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना दिल्या.
याप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक , ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, इंडियन मर्चंट चेंबरचे चेअरमन रमण खुराणा, महाराष्ट्र दिनमाचे संपादक शैलेंद्र शिर्के आदी  उपस्थित होते.
आपल्या शैलीदार भाषणात पंकजाताई  म्हणाल्या की, सोशल मिडियाच्या आजच्या जमान्यात माध्यमांच्या विश्वासाहर्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना दैनिक महाराष्ट्र दिनमानने मुद्रित माध्यमांत आपली विश्वासाहर्ता टिकवून ठेवल्याबद्दल महाराष्ट्र दिनमानचे तोंडभरून कौतुक करताना सकारात्मक पत्रकारिता जोपण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी दिनमान परिवाराला मनापासून शुभेच्छा दिल्या. शासन आणि प्रशासन दोघांनीही हातात हात घालून चांगले काम केले पाहिजे. या कामात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनीही समाजाभिमुख आणि सकारात्मक पत्रकारितेवर भर दिला पाहिजे, असे आवाहनही पंकजाताईंनी केले.
‘गेम चेंजर्सं’चा गौरव
आजही वर्तमान पत्रात प्रसिद्ध होणार्‍या बातमीची विश्वासार्हता टिकून आहे, मुद्रित माध्यमांसोबत इलेक्ट्रानिक माध्यमांनीही ती टिकवून ठेवण्यावर भर दिला पाहिजे. चांगल्या गोष्टींना कधीच उशीर होत नाही झालाच तर तो वाईट आणि खमंग बातमीदारीला होतो. या बदलत्या काळात आपली विश्वासाहर्ता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र दिनमानने खर्‍या अर्थाने गेम चेंजर्सची भूमिका पार पाडावी, यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा, असे मार्गदर्शनही पंकजाताईंनी केले. समाजात चांगले काम करणारे निश्चितच गेम चेंजर्स आहेत, या गेम चेंजर्संना डोळ्यापुढे ठेवून सकारात्मक आणि विकासाभिमुख पत्रकारिता व्हावी, हीच काळाची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
आयुक्त संजीव जयस्वाल खरे गेम चेंजर!
मराठवाड्यातील मागासलेल्या बीड जिल्ह्यात अधिकारी म्हणून आपल्या कामाची सुरुवात करणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे काम मी खूप जवळून पाहिले आहे, अशा जुन्या आठवणींनाही पंकजातार्ईंनी उजाळा दिला. जयस्वाल यांच्या कुशल कार्यप्रणालीमुळे ते आज ठाणे महापालिका आयुक्त पदाची महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी ठाण्याच विकास केला आहे त्यामुळेच त्यांना गेम चेंजर पुरस्कार देऊन दिनमान सन्माने गौरवले. हा गौरव माझ्या हातून होत असल्याचा मला अभिमान आहे, असेही पकंजाताई मुंडे यांनी सांगितले.
**
शिवसेना-भाजप युती बाबत नेहमीच सकारात्मक : 
गेले काही दिवस शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत युतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. शिवसेनेने स्वबळाची भूमिका घेतली असली तरी भाजपने मात्र युतीसाठी पायघड्या घालण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या युतीबाबतीत मी सकारात्मक असून शिवसेनेशी माझे वेगळे नाते आहे. ठाकरे-महाजन -मुंडे यांनी एकत्र येऊन काही वृत्तीना रोखले होत, अशी भावना पंकजार्ईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी भाजपाच्या महामेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर न लावल्याने काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली होती. पण पक्षशिस्तीच्या बाहेर जाऊ शकत नाही, असेही मुंडे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *