कल्याण दि.26 सप्टेंबर : एकिकडे  शिवसेना भाजप नेत्यांच्या विधानामुळे शिवसेना भाजप दोघेही एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे भाष्य भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी आज कल्याणात प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केले.

भाजपच्या पक्ष संघटनात्मक बैठकीसाठी ते आज कल्याणात आले होते. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. रवी पुढे म्हणाले की, काँग्रेसचा ,राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली. त्यामध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला. मात्र तरीही शिवसेनेने भाजपला धोका देत काँग्रेस ,राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडी सरकार बनवत मतदारांना धोका दिला आहे. हे सरकार किती दिवस टिकते हे आम्ही पण पाहत असून जास्त दिवस टिकेल असे वाटत नसल्याचेही रवी यांनी स्पष्ट केले. तर राज्यात आपण जिकडे जिकडे फिरतोय तिकडे महाविकास आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्याचे दिसत असून लोकशाहीत जनता या देशाची न्यायाधीश आहे. येत्या काळात तेच यावर फैसला घेतील असे सूचक वक्तव्यही सी.टी. रवी यांनी यावेळी केले यावेळी आमदार गणपत गायकवाड, रविंद्र चव्हाण, भाजपच्या भटके विमुक्त आघडीचे संयोजक नरेंद्र पवार यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *