मुंबई : शिवसेना (शिंदे गट) चे राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार १६ व १७ फेब्रुवारी रोजी होत आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नऊ मंत्री , ४३ आमदार, १३ खासदार उपस्थित राहणार आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी व पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी हे राज्यव्यापी महाअधिवेशन अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. अधिवेशनामध्ये पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे. पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा या सत्रामध्ये घेतला जाणार आहे. तसेच या महाअधिवेशनामध्ये पक्षाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असे राजकीय ठराव मांडले जाणार आहेत आणि त्यावर विचार विनिमय व चर्चा केली जाणार आहे.

तिसऱ्या सत्रामध्ये आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आपण काय तयारी केलेली आहे, आणखी काय तयारी करायला हवी, याबद्दल पक्षाचे जेष्ठ नेते सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वरिष्ठ नेते आणि पदाधिऱ्यांमध्ये खुली चर्चा या सत्रात होणार आहे. तिसऱ्या सत्राच्या समारोपानंतर संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते संबोधित करतील.

राजू शेट्टी यांचा इशारा..

गेल्या हंगामातील गाळप झालेल्या उसाला शंभर रुपये अधिक दर द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. राजू शेट्टी यांनी आंदोलन छेडल्यानंतर तसेच पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये मध्यस्थी करत तोडगा काढला होता. दरम्यान आजही अतिरिक्त पैसे देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 16 साखर कारखानदार नकार देत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. ऊस उत्पादक शेतक-यांचे ठरल्याप्रमाणे गतवर्षीचे 100 रूपये थकीत बील तातडीने देणे संदर्भात शासनाने पावले उचलावीत अन्यथा मुख्यमंत्र्याना कोल्हापुरात १६ फेब्रुवारीला काळे झेंडे दाखवून त्यांचे स्वागत करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *