कल्याण: महावितरणच्या कल्याण परिमंडलात थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ७० हजार ६८६ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १०५ कोटी रुपये थकीत असून चालू वीजबिलासह थकबाकी व पुनर्रजोडणी शुल्क भरल्यानंतरच त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकेल. याव्यतिरिक्त परिमंडलातील ७ लाख ८३ हजार ग्राहकांकडे मार्च-२०२१ पर्यंतची ४०२ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. याशिवाय एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांची थकबाकी १४२ कोटींवर पोहचली आहे. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असून वीज ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणाऱ्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ८ हजार ७७१ ग्राहकांचा (७ कोटी ७ लाख थकीत), ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग व उल्हासनगरचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत १४ हजार ९२३ ग्राहकांचा (४९ कोटी थकीत), वसई व विरार समाविष्ट असणाऱ्या वसई मंडल कार्यालयांतर्गत सर्वाधिक २७ हजार ५२७ ग्राहकांचा (२८ कोटी ३३ लाख) आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या (वसई व विरार विभाग वगळून) पालघर मंडलात १९ हजार ४६५ ग्राहकांचा (२० कोटी ७४ लाख थकीत) वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक तसेच सार्वजनिक सेवेतील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे. थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिल व पुनर्रजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही. शेजाऱ्यांकडून अथवा चोरट्या मार्गाने वीजपुरवठा घेणे धोकादायक असून यात वीज देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अधिकृतपणे वीज वापर करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी परिमंडलातील वीज ग्राहकांना केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *