कल्याण परिमंडलात २० टक्के ग्राहक; विशेष तपासणी मोहिमेत होणार पडताळणी 

कल्याण: महावितरणच्या कल्याण परिमंडलात दरमहा ३० युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या ग्राहकांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. परिमंडलात तब्बल २० टक्के ग्राहकांचा वीजवापर ३० युनिटपेक्षा कमी असून या सर्व ग्राहकांच्या वीज वापराची पडताळणी करण्यात येणार आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करून महसूल वाढीच्या उद्देशाने ३० जुलैपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. 

मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार ३० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या परिमंडलातील ३ हजार ग्राहकांची नुकतीच पडताळणी करण्यात आली. यात बहुतांश ठिकाणी नादुरुस्त किंवा बंद वीजमीटर, मीटरचे सील तुटणे, मीटर घराच्या आत असणे, मीटरशी छेडछाड किंवा वीजचोरी, वीज भारात बदल, चुकीचे रिडींग आदी बाबींमुळे वीजवापर कमी असल्याचे आढळून आले. परिणामी होणारे नुकसान टाळण्यासाठी ३० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या सर्वच ४ लाख ४४ हजार २३८ ग्राहकांची पडताळणी करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणाऱ्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ८० हजार ८४९, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग व उल्हासनगरचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत १ लाख ३ हजार ४३५, वसई व विरार समाविष्ट असणाऱ्या वसई मंडळ कार्यालयांतर्गत सर्वाधिक १ लाख ५६ हजार ६६१ आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या (वसई व विरार वगळून) पालघर मंडळात १ लाख ३ हजार २९३ ग्राहकांचा दर महिन्याचा वीज वापर ३० युनिटपेक्षा कमी आहे. 

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु असून तपासणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विभाग व उपविभागीय स्तरावर विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून मोहिमेच्या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. या मोहिमेत कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी परिमंडलातील ग्राहकांना केले आहे. 

———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *