मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांध्यासह मान्यवरांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

मुंबई, : – राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. सर्वच पक्षांत त्यांच्या विचार सरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले.

  राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला – जयंत पाटील

गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहेच. शिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला अशा शब्दात आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली. 


*महाराष्ट्रानं सद्गगुणी सुपुत्र गमावला* : अजित पवार

  “ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत ! : नाना पटोले* 

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत झाला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी 55 वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृत शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाही तर महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

*एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला! :अशोक चव्हाण

राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला, या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, भाई एक निस्पृह आणि चारित्र्यवान नेते होते. शेतकरी, कष्टकरी व गरिबांप्रती ते आयुष्यभर कटिबद्ध राहिले. तत्व, मूल्य आणि विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती व त्यामुळेच मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ आपले प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेच्या या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रामुख्याने सांगोला परिसरासाठी त्यांनी मोठे काम केले. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासोबतच सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली.


मागील अनेक वर्ष विधिमंडळात त्यांचे काम जवळून बघण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा ते एक चालता-बोलता विश्वकोश होते. प्रचंड ज्ञान आणि अफाट कार्यक्षमता असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. आयुष्यभर त्यांची राहणी अगदी साधी राहिली. मागील विधानसभा निवडणुकीत ते ९३ वर्षांचे असताना सुद्धा पुन्हा त्यांनीच उभे रहावे, यासाठी तेथील जनता आग्रही होती. यातून अगदी नव्वदीतही त्यांची लोकप्रियता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास कायम होता, हे दिसून येते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *