डोंबिवली, दि. १४ :ऑक्टोबर : माजी आमदार सुभाष भोईर यांच्या विशेष निधी २०१९-२०२० मधून युनिअन बँक ते रविकिरण सोसायटीपर्यंत सहा इंचाची जलवाहिनी टाकण्याचे काम अखेर पूर्णत्वास गेले. या कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी सकाळी नांदिवली खालचा पाडा येथील रविकिरण सोसायटीत सुभाष भोईर यांच्या हस्ते पार पडला. या जलवाहिनीच्या माध्यमातून चेरा नगर ते रविकिरण सोसायटी परिसरातील शेकडो रहिवाशांची पाण्यासाठीची समस्या कायमस्वरूपी सोडवली जाणार आहे. अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, परंतु आता या नवीन जलवाहिनीमुळे त्यांची समस्या संपुष्टात येईल.

या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपतालुकाप्रमुख सुखदेव पाटील, मुकेश पाटील, शंकर म्हात्रे, रमेश म्हात्रे, अनिल म्हात्रे, हरीश देसले, मोहन पाटील, अरुण पाटील, रघुनाथ पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही.” त्यांनी या जलवाहिनीच्या कामासाठी दीर्घकाळापासून पाठपुरावा केला आणि आज ते काम पूर्ण झाल्याने त्यांना समाधान वाटत आहे.

भोईर यांनी यावेळी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेचा उल्लेख करून सांगितले की, “महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात, सामान्य जनतेचे हक्क सुरक्षित आहेत.” त्यांनी स्पष्ट केले की, “सध्याचे सरकार निवडणूक लक्षात ठेवूनच योजना लागू करत आहे.” असे असूनही, लोक अशा योजनांना बळी पडणार नाहीत आणि महाविकास आघाडीलाच पुन्हा एकदा निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भोईर यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली असून, पाणीटंचाई दूर करण्याच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक विकासकार्याला लोकांचा पाठिंबा वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान भोईर यांच्या निधीतील जलवाहिनी प्रकल्पाच्या भूमिपूजनाने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे, तसेच आगामी राजकीय घडामोडींवरही त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *