डोंबिवली : लोकल प्रवासात विसरलेली १ लाख ६२ हजाराची रोकड असलेली बॅग डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशाला परत केल्याचा प्रकार घडला आहे.  डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या अंमलदाराच्या प्रामाणिकपणामुळे ही पैशांची पिशवी प्रवाशाला परत मिळाली. जयराम संजीव शेट्टी (42) असे लोकलमध्ये बॅग विसरलेल्या प्रवाशाचे नाव आहे. 

जयराम शेट्टी हे गुरुवारी आपल्या काही कामानिमित्त डोंबिवलीहून विक्रोळी येथे गेले होते. काम उरकून ते संध्याकाळी डोंबिवलीतील घरी येण्यास निघाले. विक्रोळी रेल्वे स्थानकात त्यांनी कल्याणला जाणारी लोकल पकडली. या लोकलने प्रवास करत असताना त्यांनी आपल्या जवळील एक लाख 62 हजार रूपयांची पिशवी लोकलमधील रॅकवर ठेवली आणि ते मोबाईलमध्ये व्यस्त झाले.   डोंबिवली स्थानक आल्यानंतर घाईगडबडीत ते लोकलमधील रॅकवर ठेवलेली बॅग घेण्यास विसरले. घरी गेल्यानंतर रोख रक्कम असलेली बॅग आपण लोकलमध्ये विसरल्याचे लक्षात आल्यावर शेट्टी अस्वस्थ झाले. दरम्यान, लोकल डोंबिवली सोडून कल्याणच्या दिशेने रवाना झाली होती. 

१५ ऑगस्ट निमित्त लोहमार्ग पोलिस ठाकुर्ली रेल्वे स्थानकात गुरूवारी संध्याकाळी गस्त घालत होते. रेल्वे स्थानकात लोकल आल्यावर रावसाहेब चौधरी, रोहिणी बांबले, अभिमन्यू बोईनवाड, प्रगती जाधव या कर्मचाऱ्यांनी लोकल डब्यात काही संशयास्पद वस्तू नाही ना याची खात्री करण्यासाठी तपासणी सुरू केली. पोलिसांना एका रॅकवर एक काळी बॅग असल्याचे आढळले. तेथे कोणीही प्रवासी नसल्याने पोलिसांना संशय आला. बॅगचे फोटो/व्हिडियो काढून तपासणी केली असता त्यात रोकड आढळून आली. सदर बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रांवरून जयराम शेट्टी यांची असल्याचे समजल्यावर पोलिसांनी शेट्टी यांना संपर्क केला. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन सदर बॅग वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या उपस्थितीत त्यांना परत करण्यात आली. बॅग जशीच्या तशी परत मिळाल्यामुळे जयराम शेट्टी यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *