डोंबिवली : देशात दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. सरकारी पातळीवर याकरिता जनजागृती होत असली तरी लोकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. कर्करोगाचे निदान सुरुवातीला झाले तर उपचारही तातडीने होऊ शकतात. मात्र तसे न होता कर्करोग तिसऱ्या स्टेजपर्यंत गेल्यानंतर रूग्ण उपचारांसाठी डॉक्टरांकडे धाव घेतात. याउलट इतर देशात रुग्ण लवकर तपासणीसाठी येत असल्याने कर्करोगावर लवकर उपचार सुरु होतात. रूग्णांनी वेळीच उपचार घेतल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होण्यास मदत होते त्यामुळे नागरिकांनी कर्करोगाबाबत जागरूकता दाखवली तर देशातील कर्करोग नियंत्रणात आणू शकतो असे मत डोंबिवलीतील नामवंत कर्करोग तज्ञ डॉ अविनाश तळेले यांनी व्यक्त केले.
 
४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस म्हणून ओळखला जातो त्याच पार्श्वभूमीवर डॉ अविनाश तळेले आणि रेडीओलॉजिस्ट  डॉ. रौनकलक्ष्मी शिरसाट यांचा  डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यांनी कर्करोगाविषयी समज – गैरसमज आदी विषयी विस्तृत माहिती दिली.   महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोगाचे प्रमाण समोर येत आहे. कर्करोग  ३० ते ५० वर्ष वयाच्या व्यक्तीत वाढत आहे.  १६ वर्षाखालील वयोगटातील कर्करोगाचे प्रमाण  ६ ते  ८  टक्क्यांनी वाढलेले असल्याची माहिती डॉ. तळेले यांनी दिली.

३ वर्षात १५ टक्के रूग्ण वाढण्याची शक्यता 

सद्याच्या जीवनपद्धतीत बदल झाला असून, प्रदूषण, सकस आहाराची कमतरता, राहणीमान, व्यायामाकडे दुर्लक्ष आणि व्यसन… यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. आयसीएमआर आणि भारतीय आजारांविषयी माहिती देणाऱ्या संस्था नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फमॅटिक्स अॅड रिसर्च (बँगलोर) च्या अभ्यासानुसार २०२५  पर्यंत १२ ते १५ टक्के कर्करोगाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या जागरूक व्हा असे आवाहनही डॉ अविनाश तळेले यांनी केले. 

महिला, तरूणींसाठी या तपासणी आवश्यक 

प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसते. काही गाठी साध्या असतात. ओन्कोलाॅजिस्ट, रेडीओ लाॅजिस्ट आणि पॅथॅलाॅजिस्ट हे गाठीत फरक करण्यास मदत करतात. ४० वर्षावरील सर्व महिलांनी वर्षातून एकदा स्क्रीनिंग मॅमोग्राफी करणे आवश्यक आहे. सर्व विवाहित महिलांनी तीन वर्षांतून एकदा स्त्रीरोग तज्ञांकडून पॅप स्मीरअर तपासणी केली पाहिजे. तर तरुणींनी एचपीव्ही व्हॅसीन घेतले पाहिजे.  एचपीव्ही इन्फेशनमुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते असे रेडीओलॉजिस्ट  डॉ. रौनकलक्ष्मी शिरसाट यांनी सांगितले.

या गोष्टींमुळे कर्करोग वाढू शकतो ….

वाढलेले बैठे काम, धुम्रपान, अन्न पदार्थांमध्ये वाढलेले रासायनिक व कर्करोगाला पोषक पदार्थ, कीटकनाशकांचा वापर, अल्कोटिव्ह, प्रोसेस फूड व फास्ट फुडचेचे वाढलेले प्रमाण…  या गोष्टीमुळे कर्करोग वाढू शकताे. रोज व्यायाम करून लठ्ठपणा दूर ठेवण्यामुळे  १५  ते २० टक्के छातीचे व आतड्यांचे कर्करोग टाळू शकतो.  तरुण व लहान मुलांना तंबाखू व धुम्रपानाचे दुष्परिणामांची माहिती दिली पाहिजे. त्यामुळे मुख कर्करोग कमी होतील असेही  डॉ. अविनाश तळेले यांनी सांगितले.

2 thoughts on “….. तर कर्करोग नियंत्रणात आणू शकतो : डॉ अविनाश तळेले यांचे मत”
  1. Very nice and important message to society.
    We need to spread such information to create awareness.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *