मुंबई महापालिकेचा “प्रतिष्ठा” पुरस्काराने गौरव 

मुंबई – अतिवृष्टीच्या काळात मुंबईतील नागरिकांशी संवाद साधून अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला जनसंपर्क आणि संवाद क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संवाद समन्वयासाठी दिला जाणारा ‘प्रतिष्ठा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘बेस्ट क्रायसिस मॅनेजमेंट कॅम्पेन’ या गटात सर्वोत्कृष्ट संवाद समन्वयासाठी राज्याचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाते सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पालिकेच्या वतीने उपायुक्त डॉ. किशोर क्षिरसागर आणि उपजनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये आयोजित इंडकॉम २०१७ या जनसंपर्क आणि संवाद क्षेत्राच्या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया’ आणि गोल्डमन संवाद यांच्या पुढाकाराने जनसंपर्क आणि संवाद विषयक दोन दिवसांच्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदे दरम्यान संवाद आणि जाहिरात क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील संस्थाचा आणि मान्यवरांचा प्रतिष्ठा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
२९ ऑगस्ट व १९ सप्टेंबर २०१७ या दोन्ही दिवशी मुंबईत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली होती. या दोन्ही दिवशी अफवा देखील निर्माण झाल्या होत्या. या अफवांमुळे जनसामान्यांमध्ये, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरू शकते हे लक्षात घेऊन, या अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुनोजित व्यवस्थापनांतर्गत नियंत्रण करण्यात आले. यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने मुंबई शहरात पडलेल्या पावसाची वस्तूनिष्ठ माहिती तात्काळ नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी सर्व माध्यमांचा वापर केला. त्याचबरोबर ज्या अफवा आहेत त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे घोषित करण्यात आले व त्यानुसार पोलिस तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. याची दखल घेत महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे.

….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *