रस्त्यासाठी भिवंडीकरांचे भीक मांगो आंदोलन :  जमा केलेला निधी स्वीकारण्यास पालिका अधिकाऱ्यांचा नकार 

भिवंडी : भिवंडी महापालिका प्रशासनाकडे रस्ते दुरुस्तीसाठी निधी नसल्याने सोमवारी सकाळी भिवंडी संघर्ष समितीचे प्रमुख सुहास बोंडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी भीक मांगो आंदेालन छेडले. यावेळी जमा केलेला निधी पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी हा निधी स्वीकारण्यास नकार दिल्याने जमा झालेल्या निधीचे डबे नागरिकांनी उपविभागीय अधिकारी डॉ.संतोष थिटे यांच्याकडे सुपूर्द करून मागण्यांचे निवेदन सादर केले.

भिवंडी शहरातील सार्वजनिक रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे.त्यामुळे अपघात, वाहतूक कोंडीसारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पालिका प्रशासन रस्ते दुरूस्ती व स्वच्छतेसाठी निधी नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन व पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना जागृत करण्यासाठी तसेच पालिकेस आर्थिक मदत करण्यासाठी  ‘ आम्हीं भिवंडीकर ‘ संघर्ष समितीच्यावतीने सकाळी शहरातील महिला व नागरिकांनी हातामध्ये डबे घेऊन भिक मांगो मोर्चा आंदोलन शिवाजी चौकातून सुरु केले बाजारहाट करण्यासाठी निघालेले नागरिक व दुकानदारांकडून हा निधी डब्यामध्ये ढोलताशा वाजवून जमा केला जात होता.यावेळी संतप्त नागरिकांनी पालिका प्रशासन व नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.शिवाजी चौक येथून निघालेला मोर्चा कासारआळी , ठाणगेआळी , पारनाका ,बाजारपेठ , मंडई, नाविचाळ , तीनबत्ती ,कोटरगेट,निजामपूरामार्गे महापालिका कार्यालय येथे संपन्न झाला.शहरातील नागरिकांना पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे खराब रस्ते,स्वच्छता,पिण्याचे पाणी आदी विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे.या समस्यांबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.मात्र प्रशासन अधिकारी ,कर्मचारी त्याकडे सराईतपणे दुर्लक्ष करीत आहे.पालिकेकडे निधी नाही अशी दिशाभूल करणारी माहिती देवून प्रशासन रस्ते दुरूस्ती करीत नाही असा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत केला.  नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्या.अशी मागणी करून भीक मागून जमा केलेल्या निधीचे डब्बे पालिका प्रशासनाने स्वीकारावे व विकास कामांसाठी या निधीचा वापर करावा असे त्यांनी सांगितले मात्र अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी निवेदन स्वीकारून निधी घेण्यास नकार दिला.त्यामुळे जमा केलेल्या निधीचे ३३ डब्बे  प्रांत अधिकारी डॉ. संतोष थिटे यांच्याकडे देण्यात आले.या मोर्चात संघर्ष समितीचे अध्यक्ष सुहास बोंडे, धनपाल देशमुख,मोहन वल्लाळ, नारायण जाधव, अरहम फारुकी, पुनमताई बोंडे,   रोमा निलेश आळशी, वृषाली कोंडलेकर, आर्शी बोंडे,संजय चव्हाण,आर.ए.मिश्रा आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *