भय्यु महाराज यांनी गोळी झाडून केली आत्महत्या
इंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र  त्यांनी आत्महत्या का केली, याबाबतची माहिती अजून कळू शकलेली नाही.
भय्यू महाराजाना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस होते. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.

भय्यू महाराज यांनी गेल्या वर्षी 30 एप्रिल 2017 रोजी दुसरं लग्न केलं होतं. चार वर्षांपूर्वी भय्यू महाराज यांच्या वडिलांचं आणि 2 वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणींनी लग्नासाठी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भय्यू महाराज पुन्हा लग्नबंधनात अडकले होते.

भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक होता. भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *