बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलबजावणीत बीड जिल्हा देशात अव्वल !
पंतप्रधानांच्या हस्ते उद्या दिल्लीत होणार पुरस्काराचे वितरण
मुंबई (अजय निक्ते) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे. योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हयाला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणार आहे.
गेल्या दोन वर्षांत बीड जिल्हयातील शेतकऱ्यांचा विमा भरण्याकडे सकारात्मक कल दिसला शिवाय शेतकऱ्यांनी या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, त्यामुळे जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. शेतक-यांना पीक विमा भरण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे पालन संबंधित यंत्रणांनी केल्यामुळे हा पुरस्कार जिल्ह्याला मिळाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६-१७ आणि सन २०१७-१८ मध्ये केलेल्या उत्कृष्ट अंमलबजावणीबद्दल प्रधानमंत्री उत्कृष्ट लोक प्रशासन पुरस्कार जिल्हयाला जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात सन २०१६ च्या खरीप हंगामात १३ लाख ५४ हजार ४९६ शेतकरी सहभागी झाले होते. ६ लाख ३३ हजार २८६ विमा संरक्षण क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. यासाठी ५५४६.०२ लक्ष रुपये विमा हप्ता भरण्यात आला होता. ६ लाख २४९ लाभार्थ्यांना २३२८४.४१ लाख विमा मंजूर झाला. तसेच रब्बी हंगामात १ लाख ६१ हजार ७४ शेतकरी सहभागी झाले होते. ९९ हजार ४१ विमा संरक्षित क्षेत्रासाठी २६२.५७ लाख रुपये हप्ता भरण्यात आला होता. ७ हजार १२९ लाभार्थ्यांना ४०५.०४ लाख रुपये विमा मंजूर झाला. अशा प्रकारे एकूण १५ लाख १५ हजार ५७० सहभागी शेतकऱ्यांनी ७ लाख ३२ हजार ३२७ विमा संरक्षित क्षेत्र करण्यासाठी ५८०८.५९ विमा हप्ता भरला होता. ६ लाख ७ हजार ३७८ लाभार्थी शेतकऱ्यांना २३६८९.४५ एवढा विमा मंजूर झाला.
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१७-१८ च्या खरीप आणि रब्बी हंगामात एकूण १६ लाख ३० हजार ४९१ शेतकरी सहभागी झाले होते. ७ लाख ३२ हजार २९३ विमा संरक्षीत क्षेत्रासाठी ७१६५.४५ विमा हप्ता भरलेला होता. या वर्षाम ३२४० लाभार्थ्यांना ३४९.०३ विमा मंजूर झाला. प्रधानमंत्री पीक विमा अंमलबजावणी देशात सर्वोत्कृष्ट केल्याबद्दल प्रधानमंत्री कार्यालयाकडून हा पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र बीडच्या जिल्हाधिका-यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. दरम्यान हा पुरस्कार पटकावून जिल्हयाची मान देशात उंचावल्याबद्दल ना. पंकजा मुंडे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.