भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच निधन 

   

दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते ९३ वर्षाचे होते. किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांना ११ जून रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते.

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. उत्तर प्रांतातील बाटेश्वर येथून वाजपेयी यांचे आजोबा पं. श्यामलाल ग्वाल्हेरजवळील मोरेना येथे स्थलांतरित झाले होते. अटलबिहारी यांचे वडील कृष्णबिहारी वाजपेयी हे उत्तम कवी आणि शिक्षक होते. ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातून अटलबिहारी यांनी पदवी संपादित केली, त्यांना हिंदी, संस्कृत व इंग्रजी विषयांत प्रावीण्य मिळाले होते. सध्या या महाविद्यालयाचे नाव लक्ष्मीबाई महाविद्यालय असे आहे. त्यानंतर त्यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात निष्णात पदवी मिळवली. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. त्यांच्यावर बाबासाहेब आपटे यांच्या शिकवणीचा विशेष प्रभाव होता. १९४७ साली वाजपेयी संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून काम करू लागले. त्यानंतर ते पांचजन्य, स्वदेश, वीर अर्जुन, राष्ट्रधर्म या दैनिकांसाठी काम करू लागले. १९४२मध्ये त्यांनी छोडो भारत आंदोलनात २३ दिवस कारावास भोगला होता.

देशाच्या राजकारणात जवळपास ६० वर्ष अविरत उत्साहाने आणि अतिशय सभ्यतेने वावरणा-या राजकारण्यांमध्ये अटलजींचे नाव आदराने घेतले जाते. एक हिंदी कवी म्हणून जीवनाची सुरुवात करणारे अटलजी, हे शामाप्रसाद मुखर्जी यांच्या सहवासात आले. त्यांचे सचिव बनले आणि अटलजींच्या नेतृत्वाला परिसस्पर्श झाला. १९५७ मध्ये बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत पहिल्यांदा पाऊल ठेवणारे वाजपेयी, बलरामपूरला निवडणूक लढवायला जाताना कोणतेही रिझव्‍‌र्हेशन नसलेल्या तिस-या वर्गाच्या डब्यात, जिथे सामान ठेवतात त्या वरच्या बाकावर झोपून बलरामपूरला पोहोचले होते. त्यांच्या लालित्यपूर्ण लिखाणात (अपनी अपनी बात) त्यांनी त्या प्रवासाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. संसदेमध्ये पहिल्यांदा दाखल झाल्यानंतर तरुणपणातल्या त्यांच्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकाला आणि विषयांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या सदस्याला, सत्ताधारी पक्षाच्या बाकावरचे सदस्य किती सन्मानाने वागवतात आणि त्याचा कसा आदर करतात, याचे उदाहरण वाजपेयीच आहेत. त्यावेळचे सर्वोच्च लोकप्रिय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही वाजपेयी यांच्या अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण भाषणाने प्रभावीत होत असत आणि याच पंडितजींनी तेवढय़ाच मोकळेपणाने १९५८ सालातच सांगून टाकले होते की, ‘प्रधानमंत्री पद के लिए अटलजी का एक दिन पक्का..’ पंडितजींचे ते शब्द २८ वर्र्षानी खरे ठरले. १९९६च्या लोकसभेत १६२ जागा मिळवणा-या भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि अवघ्या १३ दिवसांकरिता वाजपेयी पंतप्रधान झाले. लोकसभागृहात पुरेसे बहुमत मिळवता आले नाही म्हणून मतदान होण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रपतींकडे जाऊन राजीनामा सादर केला.

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रभावामुळे जनसंघाचे काम करू लागले. १९५७ साली बलरामपूर मतदारसंघातून ते लोकसभेत गेले. तेव्हा त्यांच्या वक्तृत्वाने पं. नेहरूही प्रभावित झाले होते. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यावर वाजपेयी यांनी त्याविरोधात भूमिका घेऊन विशेष कार्य केले होते. १९७७ साली जनसंघ जनता पार्टीत विलीन झाल्यावर मोरारजी देसाई यांचे सरकार केंद्रात सत्तेत आले होते. या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हिंदीत भाषण करणारे ते पहिले नेते ठरले. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. काँग्रेसेतर सरकार देशात प्रथमच इतका काळ स्थिरपणे सत्तेत राहिले.

एक अमोघ वक्ते आणि सभा गाजवणारे नेते
पंतप्रधान होण्यापूर्वी जनसंघाचे संस्थापक सदस्य, खासदार (१९५७, १९६२), जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), लोकसभेतल्या जनसंघ गटाचे नेते (१९५७ ते १९७७), जनता पक्षाच्या सरकारात परराष्ट्रमंत्री (१९७७ ते १९७९), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८० ते १९८६), भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८० ते १९९६), भारताचे पंतप्रधान, (१९९६ आणि १९९८ ते २००४) अशी त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द आहे. या कारकिर्दीप्रमाणेच सामान्य माणसाला वाजपेयी माहिती आहेत ते एक अमोघ वक्ते आणि सभा गाजवणारे नेते म्हणून. जुन्या जनसंघाने आणि नंतर भाजपाने ‘प्रधानमंत्री की अगली बारी-अटलबिहारी’ अशा अनेक वेळा घोषणा दिल्या होत्या. त्या घोषणा वाजपेयी यांच्या नेतृत्वामुळेच वास्तवात उतरू शकल्या. ते पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांचा चेहरा कधी ‘कट्टर’ वाटला नाही आणि त्यांची सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन जाण्याची सर्वव्यापक भूमिका कधीही लपून राहिली नाही. राजकीय हिंसाचाराला वाजपेयींचा जसा विरोध होता तसाच जाती-धर्माच्या नावावर राजकारणात टोकाचे मतभेद करण्यालाही त्यांचा विरोध होता. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा त्या सगळ्या उन्मादात वाजपेयी कुठेही सामील झालेले नव्हते आणि ‘जे झाले ते योग्य झालेले नाही’, असे त्यांचे प्रांजळ मत त्यांनी अगदी स्पष्टपणे नोंदवलेले होते. ते काँग्रेसचे विरोधक होते; पण, देशाच्या उभारणीत काँग्रेसचा जो प्रचंड त्याग आहे, त्याबद्दल नेहमीच ते आदराने बोलत असत. विरोधी बाकावर असतानाही पंडितजींच्या परराष्ट्र धोरणाची स्तुती करताना त्यांना कधी संकोच वाटला नाही आणि स्वत: परराष्ट्रमंत्री झाल्यावरही पंडितजींबद्दल गौरवाचे उद्गार काढताना त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही

कवी मनाचे वाजपेयी
वाजपेयींचे भाषण जेवढे मोहून टाकणारे असायचे, अगदी तेवढेच त्यांचे ललित लेखनही प्रासादिक आहे. काही काळ ते पत्रकारही होते. ‘पांचजन्य’ या साप्ताहिकात ते लेखन करीत असत. त्यांचा आणखी एक गुणविशेष म्हणजे व्यवसायाने राजकारणी असताना मनाने ते कवी होते आणि त्यामुळेच त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांच्या रसपूर्ण अशा साहित्याचा परिचय भारतीय रसिक वाचकांना झालेला आहे. त्यांचे कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कवितांच्या काव्य गायनाचे कार्यक्रमही रंगू लागले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची मने जुळली. याचे आणखी एक कारण म्हणजे राजकारणात राहूनही या दोघांची मने कवींची होती, हळूवार होती, संवेदनाक्षम होती. त्यामुळे लोकसभेत आक्रमक होणा-या या दोन्ही नेत्यांनी आपल्या हळूवार भावनांचे प्रदर्शन साहित्यामध्ये अतिशय लालित्यपूर्ण रितीने केलेले आहे. आशा या महान ,तपस्वी ,थोर व्यक्तीचा जिवन प्रवास थांबला. त्यांना सिटीझन जर्नलिस्टकडून भावपूर्ण श्रध्दांजली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *