होय, तेच हे पाय..  तापलेल्या रस्त्यांचे चटके सोशीत मुंबईत धडकले ! 
मुंबई :  डोक्यावर कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते आणि त्या रस्त्यावरून पायपीट करणारा बळीराजा ! गेल्या पाच दिवसा पासूनच हे चित्र. प्रचंड त्रास सहन करीत रविवारी हा विराट मोर्चा मुंबईत धडकला.  सोमवारी हा मोर्चा विधिमंडळावर थडकणार आहे.  सरकारने आता तरी शेतकऱ्याच्या जीवाशी खेळू नये अशीच भावना त्यांच्या व्यक्त होतेय. तर विराट मोर्चा पाहिल्यानंतर राज्यसरकारची धावपळ उडालीय.
 शेतमालाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी अशा अनेक मागण्यांसाठी नाशिकहून हजारोच्या संख्येने निघालेला  शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी मुंबईत पोहचला. पाच दिवसापासून पायपीट करीत असताना शेतकऱ्यांना खूपच यातना सहन कराव्या लागल्यात. प्रचंड उन्हाच्या त्रासामुळे दररोज किमान ४० ते ५० शेतकरी चक्कर येऊन पडल्याच्या घटना घडल्या. काही अनवाणी असल्याने तापलेल्या रस्त्याचे चटके सहन करीतच चालत होते. त्यामुळे अनेकांच्या पायाला फोड आलेत. उन्हामुळे चक्करने, मळमळ, अंग, पाय, डोके दुखी असा त्रास सहन करावा लागलाय. रविवारी शेतकऱ्यांचं हे लाल वादळ मुंबईत धडकलय. या मोर्च्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे शिवसेना आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी पाठिंबा दर्शविलाय.  सरकारनेही शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवलीय. मात्र लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मोर्चा हटणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांच्या नेत्यांची आहे.
——-
मुख्यमंत्र्यांशी उद्या चर्चा 
शेतकऱ्यांचा विराट मोर्चा विक्रोळीत पोहचल्यानंतर
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यानी शेतकऱ्यांच्या नेत्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे आश्वासन महाजन यांनी शेतकऱ्यांच्या नेत्यांना दिले. त्यामुळे मुख्यमंत्री के भूमिका घेतात याकडं लक्ष वेधलय.
——
One thought on “होय, तेच हे पाय….तापलेल्या रस्त्यांचे चटके सोशीत मुंबईत धडकले ! ”
  1. जगाचा पोशिंदा रस्त्यावर आलाय ही गोष्ट समाधानकारक नाही ..आपण त्यांच्या आवाज यंत्रणे पर्यंत पोहचवण्यासाठी योगदान देत आहात त्यासाठी आभार …. असेच त्यांच्या सोबत रहा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *