आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांचे निधन 

कल्याण दि. ३० ऑगस्ट : जागतिक किर्तीचे शिल्पकार सदाशिव उर्फ भाऊराव साठे यांचे आज वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने कला क्षेत्रात शोककळा पसरलीय. १९५४ साली महात्मा गांधींचा देशातील सर्वात पहिला पुतळा भाऊंनी साकारलाय. त्यानंतर त्यांनी अनेक महापुरूषांची, दिग्ग्जांची शिल्प साकारली. विदेशातही त्यांच्या कलेने भूरळ पाडली. 

कल्याण पश्चिमेतील गांधी चौकात असलेल्या साठेवाडा येथे साठे कुटूंबिय राहतात. भाऊंच्या पश्चात मुलगा, मुलगी , सून, नात, भाऊ असा परिवार आहे. भाऊंच्या पत्नी नेत्रा साठे या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या चित्रकार आणि लेखिका होत्या. काही वर्षांपूर्वी नेत्राताईंचे निधन झाले.  भाऊंचे बंधू डॉ. श्रीनिवास साठे हे इतिहास अभ्यासक आहेत. तर दुसरे बंधू वामनराव साठे हे जनता सहकारी बँकेचे संस्थापक आहेत.. भाऊ हे कल्याणचेच नव्हे तर देशाचे भूषण हेाते. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.

कल्याणमधील ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर सांगतात की, भाऊंचे काका हे त्या काळातील हरहुन्नरी कलाकार आणि उत्तम गणेश मूर्तीकार होते. त्यांच्या सहवासातूनच सदाशिवरावांना बालपणापासून मूर्तिकलेचे बाळकडू आणि प्रेरणा मिळाली. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जे जे आर्टसमधून १९४८  मध्ये पहिल्या क्रमांकाने शिल्पकलेचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मिळेल ते काम मिळेल ती नोकरी उमेदीच्या काळात त्यांना करावी लागली. सुप्रसिद्ध निर्माते व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत त्यांनी सेट डिझाइन विभागात नोकरी केली. मात्र त्यानंतर एका अँटिक स्टोअरमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करण्यासाठी ते दिल्लीला गेले आणि मग त्यांच्या ‘शिल्पकाराच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मात्र तिथेही त्यांच्यातील कलाकाराची काहीशी घुसमट होत असताना दिल्ली नगरपालिकेने केलेल्या घोषणेनंतर भाऊंमधील कलाकाराला काही तरी करून दाखवण्याची एक आव्हानात्मक संधी प्राप्त झाली.

राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक ..

दिल्ली नगरपरिषदेने १९५४  मध्ये महात्मा गांधीजींचा भव्य पुतळा दिल्लीत उभारण्याची घोषणा केली. महात्मा गांधींचा हा भारतातील सर्वात पहिला पुतळा बनणार असल्याने साहजिकच त्यामध्ये देशभरातील शिल्पकारांनी रस दाखवला. मात्र भाऊंनी आपल्या जिद्दीच्या आणि कलेच्या बळावर हे काम मिळवत हाताशी कोणतीही साधने किंवा मोठा अनुभव नसतानाही हे काम अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले. त्यानंतर १९५४ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन भाऊंचा गौरव करण्यात आला. यानंतर भाऊंच्या शिल्पकलेच्या अश्वाने अक्षरशः देश-विदेशात ठळकपणे पाऊलखुणा उमटवल्या. 

महापुरूषांचे, दिग्गजांचे पुतळे
 

ग्वाल्हेरला झाशीच्या राणीचा पुतळा बनवला, नागपूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी अनेक अत्युतकृष्ट शिल्प बनवली. तसेच दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. त्यापाठोपाठ लाल किल्ल्यावरील सुभाष चंद्र बोस यांचा  पुतळा, पोरबंदर येथील मोरारबाजीचा पुतळा यांसारख्या अनेक दिग्गज आणि नामांकित व्यक्तिमत्वाचे त्यांनी पुतळे बनवले. त्यामुळे संपूर्ण भारतभर भाऊंच्या नावाची आणि त्यांच्या कौशल्याची चर्चा सुरु झाली.

 विदेशातही भाऊंच्या कलेची भूरळ …

१९७२ मध्ये भाऊ इंग्लंडला गेले होते. तिथे त्यांनी अवघ्या दिड तासात लॉर्ड माउंटबॅटन यांचा पुतळा साकारला. भाऊंच्या कलेची ही कीर्ती तत्कालीन राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप्स यांच्यापर्यंत पोहोचली. आणि मग प्रिन्स फिलिप्स यांच्या विनंतीवरून भाऊंनी राणी एलिझाबेथ यांचाही पुतळा बनवला आणि आपल्या कलाकृतीने इंग्रजांना भुरळ पाडली अशीही आठवण  ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर सांगतात. 

डोंबिवलीत चित्रनगरी साकारली..

‘शिल्पकला ही आज केवळ पुतळ्यांपर्यंतच मर्यादित आहे. मात्र शिल्प हे माणसाच्या सर्वांगीण भावनांचे चित्रण करणारे एक माध्यम आहे असे ते मानत. त्यातूनच त्यांनी डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र चित्र नगरीची निर्मिती केली. पु.ल.देशपांडे. शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, गान सम्राज्ञी लता मंगेशकर, उस्ताद बिस्मिल्ला खॉं अशा विविध साहित्यिक-संगीत क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींच्या ते सहवासात होते. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला देशभरातून  भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण केली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *