मुंबई /प्रतिनिधी – लोकशाहीर आणि साहित्यरत्न दिवंगत अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 01 ऑगस्ट, 2020 रोजी सांगता होत आहे. आपल्या प्रत्ययकारी लेखनप्रतिभेने कथा, कादंबरी, पोवाडा, पटकथा, प्रवासवर्णन आदि विविधांगी साहित्याव्दारे त्यांनी शोषित-वंचित समाजघटकांची व्यथा, वेदना समर्थपणे मांडली. केंद्र सरकारकडे, राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेवून आदरणीय अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, अशी शिफारस या पत्रात विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील वास्तव्यात कामगार-श्रमिकांचे लढे तसेच भारतीय स्वातंत्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम यात त्यांनी सहभागी होत आपल्या शाहिरीव्दारे मोठी जनजागृती घडवली. “फकिरा” या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीसह अन्य कथा, कादंबऱ्याही अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यांना “भारतरत्न” पुरस्काराव्दारे सन्मानित करण्यात यावे, अशी भावना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांच्यावतीने व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *