आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज !

फसवी कर्जमाफी, बोंडअळी, गारपिटी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजणार

मुंबई : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झाला असून त्या अनुषंगाने काँग्रेस विधीमंडळ समन्वय समितीची बैठक विधीमंडळ काँग्रेस पक्ष कार्यालय, विधानभवन येथे पार पडली.  यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत रणनीतीवर चर्चा झाली. राज्यातील ज्वलंत समस्या, अधिवेशनातील संभाव्य मुद्दे व चर्चेचा प्राधान्यक्रम, तसेच विविध आघाड्यांवर सरकारचे अपयश आदींबाबतही यावेळी विचारविनिमय करण्यात आला. फसवी कर्जमाफी, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी, सरकारकडून सातत्यान होणारे इव्हेंट आदींसह इतर अनेक विषय या अधिवेशनात लावून धरण्याच्या सूचना या बैठकीत मांडण्यात आल्या. या बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, प्रतोद संजय दत्त, आ. नसीम खान, आ. वर्षा गायकवाड, आ. प्रा. वीरेंद्र जगताप आदी नेते उपस्थित आहेत. तसेच २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्व विरोधी पक्षातील गटनेत्यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक असून, त्यामध्ये सरकारविरोधातील रणनितीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *