शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीमुळे शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत
– कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

नागपूर : शेतकऱ्यांने उत्पादित केलेल्या शेतमालाची थेट ग्राहकाला विक्री केल्यास ग्राहकांना योग्य दरात चांगल्या प्रतीचा माल मिळतो, त्याचबरोबर शेतमालास योग्य भाव मिळण्यास मदत होते. त्यामुळे संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राज्य शासन राबवीत आहे. यामाध्यमातून ग्रामीण भागातील शेतमालाला शहरात बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग परिसरातील अॅग्रोनॉमी हॉल येथे आयोजित ‘संत्रा व तांदूळ महोत्सव 2017’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ‘आत्मा’चे संचालक डॉ. सुभाष खेमणार, पुणे कृषी आयुक्तालय येथील फलोत्पादन विस्तार संचालक डॉ. सु. ल. जाधव, नागपूर विभागीय कृषी सह संचालक एन. टी. सिसोदे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. नारायण लांबट, भीमराव कडू, ‘आत्मा’च्या नागपूर प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर, गडचिरोली प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार कृषी महाविद्यालयाचे प्रा. विजय खवले, आर. पी. गजभिये आदी उपस्थित होते. शेतमालावर प्रक्रिया करणे व त्याची विक्री करण्याच्या व्यवसायामध्ये शेतकरी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याकरिता कृषी विभागामार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सहकार्य केले जात आहे. तसेच गट शेतीला प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून शेतकरी गटांना मदत केली जाणार आहे. सध्या सेंद्रिय पध्दतीने पिकविलेल्या शेतमालाला अधिक मागणी आहे. सेंद्रिय शेतीमुळे कमी खर्चात अधिक उत्पादन मिळणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन उत्पादन घेतल्यास शेतमालाल चांगला दर मिळणे शक्य होईल, असे कृषी राज्यमंत्री खोत यांनी यावेळी सांगितले.

दोन वर्षात दोन केाटी शेतमालाची विक्री
‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी संत्रा व तांदूळ महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू विषद केला. गेल्या दोन वर्षात यामाध्यमातून प्रत्येकी दीड ते दोन कोटी रुपयांच्या शेतमालाची विक्री झाल्याचे सांगितले. तसेच यावर्षी या महोत्सव अंतर्गत दि. 16 ते 24 डिसेंबर 2017 या कालावधीत महाराज बाग परिसरातील अॅग्रोनॉमी हॉल येथे सकाळी 10 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत शेतमालाची विक्री सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘भिवापुरी मिरची पावडर’ व ‘गोफ्स’ ब्रँडचे विमोचन
भौगोलिक सांकेतांक (जीआय) मिळालेल्या भिवापुर मिरची पावडर विक्रीसाठी तयार करण्यात आलेला ‘भिवापुरी मिरची पावडर’ व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय तांदळाच्या विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या गडचिरोली ओर्गेनिक फार्मिंग सिस्टमच्या ‘गोफ्स’ (GOFS) ब्रँडचे विमोचन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी खोत यांनी महोत्सवातील शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांच्या दालनांना भेट देऊन विक्रीसाठी ठेवलेल्या उत्पादनांची खरेदीही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *