सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्याने महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी २७ गावातील सुमारे ५०० सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडविणार असे आश्वासन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिले होते. यानंतर अवघ्या तीनच दिवसात खासदार डॉ. शिंदे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री महोदयांसमवेत बैठकीचे आयोजन करून या सर्व सफाई कामगारांचा प्रश्न शासन दरबारी मांडला. या सर्व कर्मचाऱ्यांचा महापालिकेत लवकरच समावेश करून घेतला जाईल. तसेच यासाठीची प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामगारांच्या लढ्याला यश आले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर सर्व सफाई कर्मचाऱ्यांकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे २७ गावांमध्ये अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. तसेच या गावांचा अधिक विकास व्हावा यासाठी सर्व २७ गावांचा कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे गावात अमृत योजना, रस्त्यांची उभारणी यांसारखे अनेक विकास प्रकल्प उभे राहत आहे. याच पार्श्वभूमीवर या २७ गावांमधील सुमारे ५०० सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश करून त्यांना महापालिकेच्या नियमानुसार पगार देण्यात यावी अशी मागणी येथील कामगारांनी केली होती. यासाठी या सर्व कामगारांनी सोमवारी महापालिकेच्या आवारात निदर्शन दाखवत कामबंद आंदोलन पुकारले होते. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी या सर्व कामगारांची भेट घेऊन त्यांच्या या मागणीबाबत तोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर लगेच खासदार डॉ. शिंदे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सर्व कामगारांना महापालिकेत समाविष्ट करून त्यांना महापालिकेच्या नियमानुसार वेतन देण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच यासाठीची प्रक्रिया जलदगतीने राबविण्याच्या महापालिका प्रशासनाला सूचना केल्या. यामुळे सुमारे ५०० सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२७ गावांच्या कर माफीचा शासन निर्णय जाहीर

कल्याण डोंबिवली महापालिका अखत्यारीतील २७ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर तेथील नागरिकांना वाढीव मालमत्ता कर आकारण्यात येत होता. यामुळे येथील नागरिकांनी कर भरणा बंद केल्याने महापालिकेला देखील आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. मात्र यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून येथील नागरीकांना २०१७ पूर्वी ज्या पद्धतीने कर आकारला जात होता तोच कर आकारण्याची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन जुनाच कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत नुकताच शासन निर्णय देखील जाहीर झाला आहे. यामुळे २७ गावातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *