सातारा : शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्य स्थापनेत वाघनखांचा वाटा मोठा आहे. या वाघनखांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी ठार केले होते. कित्येक दशकानंतर ही वाघनखं महाराष्ट्रात आणली आहेत. त्यामुळे सर्वांच्या चेह-यावर आनंद आहे मात्र विरोधक याचं राजकारण करत आहेत वाघनखाचं राजकारण करणे म्हणजे महाराजांच्या विरतेचा अपमान करणं आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले, “मला विश्वास आहे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघनखं दिली. आता कुणाचा कोथडा काढायचा नाहीय. पण काहींच्या बु्द्धीवर बुरशी आली आहे. काहींच्या बुद्धीवर जंग चढला आहे. मुख्यमंत्री त्यांची या वाखनखांमधून बुरशी आणि जंग उतरवण्याचं काम निश्चितपणे कराल हा मला विश्वास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला ते वाघनख आज इंग्लंडच्या म्युझियम येथून साताऱ्यात आली आहे. साताऱ्यात वस्तू संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. या वाघनखांच्या प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

“आपल्या सर्वांकरता आजचा क्षण अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांचा उपयोग करत स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाचा सरदार असलेल्या अफजल खानाचा वध केला होता, तो चित्त थरारक प्रसंग पिढ्यांपिढ्या आपण सगळे ऐकत आलो. त्याच प्रसंगांमधील जे प्रमुख शस्त्र होतं ती वाघनखं जी अनेक वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये होती ती आपल्या भारतात या ठिकाणी आली आणि खऱ्या अर्थाने आमची राजधानी असलेल्या साताऱ्यात वस्तू संग्रहालयात आपल्या सर्व भारतीयांना आणि शिवप्रेमींना दर्शनासाठी उपलब्ध झाली, मला असं वाटतं, यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

“छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी विनंती केली की, या वाघनखांवरुन विवाद करु नका. आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे की, उठसूट प्रत्येक गोष्टीत काहीना काही विवाद निर्माण करायचा. हे असंच असेल तर, हे तसंच असेल तर? पण खरं म्हणजे हा रोग आजचा नाहीय. या रोगाचा सामना प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनादेखील करावा लागला होता. स्वराज्यातही काही अशी लोकं होती जे शंका उत्पन्न करायचे, पण त्या सर्व शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य प्रस्थापित करुन दाखवलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *