डोंबिवली, दि,१८ : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील राधाई संकुल ही सात माळ्याची बेकायदा इमारत तोडून देण्यास कल्याण डोंबिवली पालिकेच्या ई प्रभागातील तोडकाम पथकाला बेकायदा जमाव जमवून विरोध करणाऱ्या संकुलातील १३ रहिवाशांसह १५० हून अधिकच्या जमावावर पालिकेच्या ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले. मात्र भाजप पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जोरदार विरोध केला त्यांच्यावर कोणतेही प्रकारचे गुन्हे दाखल केले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलीस ठाण्यात मिळालेले माहितीनुसार,रोहित गोसावी, दत्ताराम घोगरे, दत्तात्रय जाधव, सुमीत गुरव, शशिकांत नामये, संजय होनळकर, संदेश गाडवे, समीर देशमुख, वेंकटाचलम शर्मा, सुंदरेश राजगोपाल शर्मा, दीपक मिसाळ, सोमीनाथ साबळे, प्रवीण पावशे अशी गुन्हा दाखल झालेल्या रहिवाशांंची नावे आहेत. नांदिवली पंचानंद येथे राहणारे जयेश म्हात्रे यांच्या मालकीची नांदिवली पंचानंद येथील इग्रजी शाळेच्या पाठीमागे जमीन आहे. या जमिनीवर भुमाफियांनी कल्याण डोंबिवली महापालिका, महसूल विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली.महारेराचा बनावट क्रमांक या इमारतीला घेतला. ही इमारत अधिकृत आहे असे दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी अधिकाऱ्यांच्या संगनमताने या राधाई बेकायदा इमारतीमधील सदनिका दस्त नोंदणी करून घर खरेदीदारांना विकल्या.या बेकायदा इमारतीवर कल्याण डोंबिवली पालिकेकडून कारवाई नसल्याने जयेश यांनी मुंबई उच्च न्यायालयात महापालिके विरुध्द याचिका दाखल करून ही इमारत तोडण्याची मागणी केली होती. न्यायालयाने राधाई इमारतीची जमीन जयेश यांच्या मालकीची असल्याने या जमिनीवरील बेकायदा इमारत तोडण्याचे आदेश पालिकेला दिले. मंगळवारी सदर बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी मोठ्या पाऊस पडेल तिथे गेले असता, भाजपा पदाधिकारी आणि राधाई मधील रहिवाशांनी १५० हून अधिक बेकायदा जमाव जमवून राधाई इमारतीकडे जाणारे रस्ते बंद केले. जेसीबीच्या समोर आडवे पडून रस्ता बंद केला. जमावाने पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पालिकेला राधाई इमारत तोडता आली नाही. बेकायदा जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणल्या बद्दल साहाय्यक आयुक्त जगताप यांंनी रहिवाशांसह जमाविरुध्द तक्रार केली आहे.

राधाई संकुल तोडण्यास भाजपच्या कार्यकर्त्यानी प्रखर विरोध केला. महापालिका व पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत. केवळ रहिवाशांवर गुन्हे दाखल केले.जर पोलीस आणि पालिकेने भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नाहीत तर ही माहिती आपण उच्च न्यायालयात देणार आहोत अशी माहिती जमीन मालक तथा याचिका करता जयेश म्हात्रे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *