नवी मुंबई, दि १६ :– डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे ५ लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.

कळंबोली, नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्री शिंदे यांनी आज भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शासन आपल्या पाठिशी असल्याचे रुग्णांना सांगितले. जखमींवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी उपचाराबाबत अधिक माहिती जाणून घेतली. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरित करावे लागल्यास तसे करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

खासगी बस आणि ट्रॅक्टर यांच्या मध्ये झालेल्या अपघातात ४६ जखमी आहेत. त्यापैकी ७ वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची डॉक्टरांकडून माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *