मुंबई :  निवडणूक रोखे देशातील नव्हे तर जगातील सर्वांत मोठे खंडणी रॅकेट आहे. सीबीआय आणि ईडी तपास करत नाहीत, ते भाजपची वसुली करतात, असा घणाघाती प्रहार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. भाजप निवडणूक रोख्यांच्या जोरावर पक्ष फोडतो, ही राष्ट्रविरोधी कृती असून राष्ट्रवादी काँग्रेस पैशाने फोडल्याचा आरोप त्यांनी केला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात पोहोचली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात ज्या संस्था अस्तित्वात होत्या, त्या आता भाजप आणि आरएसएसचे हत्यार आहेत, त्यामुळेच हे सर्व घडत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. या संस्थांनी त्यांचे काम केले असते तर हे सर्व घडले नसते. तसेच या सर्व संघटनांनी विचार करावा की, एक दिवस भाजपचे सरकार जाईल, मग कठोर कारवाई केली जाईल.
निवडणूक रोखे म्हणजे कंपन्यांकडून हप्ता घेण्याचा प्रकार आहे. यामध्ये अनेक कंपन्या असून काही कंपन्यांचे नाव येणे बाकी आहे. सर्व संस्थांना भ्रष्टाचार करायला सांगत असून ही पंतप्रधानांची आयडिया आहे. गडकरी किंवा आणखी कोणाची ही आयडिया नाही. भाजप राज्यांमध्ये जी सरकारे पाडत आहे, त्यासाठी पैसा कुठून येतो, भाजपने संपूर्ण राजकीय व्यवस्था ताब्यात घेतली आहे. तपास यंत्रणा आता तपास करत नसून वसुली करत आहेत. यापेक्षा मोठी देशद्रोही कृती असू शकत नाही, असेही ते म्हणाले. राज्यांमधील काँग्रेस सरकारांनी दिलेले करार आणि इलेक्टोरल बाँड्स यांचा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *