कल्याण : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटलेल्या मराठा आंदोलकांवर जालना जिल्ह्यात पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याने या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. कल्याण शहरातही मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिवाजी चौक येथे राज्य सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांची प्रतिकृती असलेले टरबूज पायाखाली चिरडून निषेध व्यक्त केला. फडणवीस यांनी पुढील 48 तासात राजीनामा द्यावा अन्यथा मराठा समाज वेगळ्या पध्दतीने आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला.

मराठा आंदोलकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण मध्ये रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कल्याण शिवाजी चौक येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर मराठा कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मराठा समाज कार्यकर्ते हर्षवर्धन पालांडे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांडे यांच्यावर करण्यात आलेल्या बेछूट लाठीच्या विरोधात हे आंदोलन आहे. हे सरकार दडपशाहीच्या मार्गाने राजकीय लोकांना चिरडण्याचा काम करत आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा लढा चिरडण्याचे प्रयत्न करत आहे. गृह मंत्रालयाच्या या कृत्यामुळे मराठा समाजाचा अपमान झाला असून समाज मोठ्या प्रमाणावर दुखावला गेला आहे. एकीकडे आंदोलन करताना बेछुट मारहाण करून त्यांच्यावरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे आदेश पोलिसांना ज्या गृहमंत्र्यांनी दिले ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *