मुंबई, दि. ९ :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीव मारण्याची धमकी सोशल मीडियावर दिल्यानंतर राज्यभर पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी काँगेस चे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रतील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.

शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही, असा विश्वासही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *