कल्याण : कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथील रिजन्सी अनंतम मधील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.एमआयडीसी कडे वारंवार पाठपुरावा करून देखील मंजूर कोठा मिळत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.त्यामुळे रविवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी रिजन्सी अनंतम मधील नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या आहेत. या संदर्भात तातडीने एमआयडीसी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात दिवसेंदिवस झपाट्याने गृहसंकुलांची काम सुरू आहेत. मात्र या बांधकामांना परवानगी देताना संबंधित यंत्रणांकडून पडताळणी केली जात नाही.त्यामुळे गृहसंकुलांमध्ये वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे.कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथे उभारण्यात आलेल्या रिजन्सी अनंतम मधील सात हजार सदनिका धारकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा कोठा मंजूर असताना देखील सात हजार सदनिका धारकांचा घसा कोरडाच राहिला आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी रविवारी रिजन्सी अनंतम मधील नागरिकांची भेट घेतली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेत तातडीने केडीएमसी, एमआयडीसी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांनी दिले आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे,सुनील राणे,संजय चव्हाण यांसह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *