Swarajya organization will enter the election fray in 2024 - Sambhaji Raje

धाराशिव, २७ फेब्रुवारी: लोकांना स्वराज्य संघटनेकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी स्वराज्य संघटना २०२४ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी जाहीर केले. यात आधी आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. मात्र समविचारी दोन लोक आले तर स्वागत आहे. खऱ्या अर्थाने फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचे विचार घेऊन चालतात, त्यांच्यासाठी आम्ही खुले आहोत. जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सुसंस्कृत करू शकतात. रयतेचे प्रश्न सुटायला पाहिजेत, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या परंडा मतदार संघात स्वराज्य संघटनेच्या ५८ शाखांचे उद्घाटन संभाजीराजेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजे म्हणाले की, आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच आरोग्य व्यवस्थेचे हाल आहेत. भूम येथील रुग्णालय महाराष्ट्रात नंबर वन हवं होतं, मात्र तशी स्थिती नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. धाराशिव येथे फिरताना मतदारसंघातील नागरिक अनेक समस्यांचा सामना करत आहेत. येथील लोकांनी मला समस्या बोलून दाखवल्या. वीज मिळत नाही. बाकीच्या राज्यात २४ तास वीज आहेत. महाराष्ट्र प्रगत असताना रुग्णालयाचे प्रश्न आहेत. दोन रुग्णवाहिकेला एकच चालक. शिफ्ट पाहिली असता दोन रुग्णवाहिकांना चार चालक हवेत.

मविआ सरकारने आधीच अस्थिर सरकार दिले. त्यानंतर नवीन आलेले सरकारही अस्थिर असल्याची टीका संभाजीराजे यांनी केली. ते म्हणाले की, लोकं कंटाळले आहेत. परत तेच करत असाल, तर लोकांना ते आवडणार नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तुमचं सरकार आलंय, तर २४ तास शेतकऱ्यांना वीज द्या. २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार होतं, ते मिळालेलं नाही. हे प्रश्न सोडवले तर आम्ही त्यांचं कौतुक करू.

संभाजीराजेंनी १२ मे २०२२ रोजी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. नाशिक पदवीधर मतदार संघात त्यांनी सर्वप्रथम निवडणुकीसाठी उमेदवार उभा केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *