येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट

मुंबई, दि.२४ –हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

विधान भवन येथे येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी अशा या अभियानाचे मुख्य प्रवर्तक म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोविड संकटाच्या काळात अडीच वर्ष राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. राज्याच्या एकूण १३ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास १४ लाख ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याआधारे यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून तसेच काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून या अभियानांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *