भिवंडीत नागरी सुविधांची बोंबाबोंब : खासदारांवर भिवंडीकर नाराज

जनतेच्या रोषानंतर लोकप्रतिनिधी धावले आयुक्तांच्या भेटीला

भिवंडी : भिवंडी शहरातील नागरिकांना पाणी, रस्ते, स्वच्छता अशा विविध समस्यां सोडविण्यासाठी फडणवीस सरकारने पालिकेला करोडो रुपयाचा निधी दिला मात्र हा निधी कागदावरच असल्याने सत्ताधारी कॉग्रेस पक्ष व पालिका प्रशासन नागरी समस्या सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे भिवंडीकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच नागरिकांनी भाजप खासदार कपिल पाटील यांना समस्यांवरून धारेवर धरल्याचा प्रकार घडला हेाता. त्यामुळे गुरूवारी खासदार कपिल पाटील व आमदार महेश चौघुले यांनी शेकडो नागरिकांसह पालिका आयुक्त योगेश म्हसे यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.

राज्य व केंद्र शासनाने भिवंडीतील रस्ते व स्वच्छते साठी गेल्या दोन वर्षात कोठ्यावधीचा निधी दिल्याची घोषणा केली आहे मात्र शहराच्या विकासासाठी निधी न आल्याने शहराची अवस्था बकाल झाली आहे. गेल्या दोन महिन्या पासून भिवंडी शहरातील कल्याण रोड सह विविध प्रभागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. त्यामुळे शहरात अपघातlचे प्रमाण वाढले आहेत. २० हुन अधिक जणांचा मृत्यू तर शंभराहून अधिक वाहन चालक जखमी झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी व धुळीमुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे स्वच्छतेवर व घंटा गाडीवर महापालिका प्रशासन लाखो रुपये दरमहा खर्च करीत आहे मात्र नियमित कचरा उचलला जात नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जंतुनाशक औषध फवारणी होत नसल्यामुळे दुर्गंधीमुळे पसरणा- या आजाराला नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत अशी तक्रार नागरिकांनी महापौर जावेद दळवी व पालिका आयुक्त योगेश म्हसे यांच्या कडे केली आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे

भाजप सरकार केवळ जाहिरातबाजी करते. त्यामुळे भिवंडीची बकाल अवस्था झाली आहे. तसेच नगरसेवक काही कामे करत नाही असा आरोप नागरिकांकडून केला जात असल्याने आज घाईघाईत खासदार कपिल पाटील व आमदार महेश चौघुले , महापौर जावेद दळवी ,नगरसेवक सुमित पाटील ,नगरसेविका कामिनी रवी पाटील, रवी सावंत कॉग्रेसचे गट नेते हलीम अन्सारी यांच्या सह मान्यवर नगरसेवकांनी आयुक्त योगेश म्हसे यांच्यी भेट घेऊन नागरी समस्या बाबत चर्चा करून त्या सोडविण्यासाठी प्रशासनाने सतर्क पणे पुढाकार ध्याव्या अशा सूचना केल्या त्यामुळे आयुक्तांनी नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले जाईल असे आश्वासन दिले

महापालिका कार्यक्षेत्रात पाणी पुरवठा विभागाच्या वतीने नियोजन होत नसल्याने नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. नळाला १५ ते २०मिनिटे पाणी कमी दाबाने येत असल्याने अनेकांना पाणी मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. भिवंडी पालिकेत मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे. ही रोखण्यात प्रशासन व नगरसेवक असमर्थ ठरत आहे. अनेकांना टँकरचे दूषित पाणी प्यावे लागत आहे त्यामुळे शालेय विध्यार्थांसह महिलांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरी सुविधांची बोंबाबोंब असल्याने नागरिक भाजपवर नाराज आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *