मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता एका पक्षातून दुस-या पक्षात जाण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. सोमवारी कल्याण ग्रामीणमधील भाजपच्या माजी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला.

कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ सुनीता पाटील आणि सायली विचारे या तीन माजी नगरसेवकासह मनसेच्या अनेक पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रकृती ठिक नसल्याने डॉ सुनीता पाटील या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. काही महिन्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. पालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता होती. मात्र महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर शिवसेना व भाजपमध्ये दरार निर्माण झालाय. त्यामुळे भाजपने मनसेशी जवळीक साधली आहे. त्यामुळे येत्या निवडणुक लागेपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

कदाचित आम्ही कुठे तरी कमी पडलो – आमदार रविंद्र चव्हाण यांची खंत

भाजपच्या माजी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही कुठे तरी कमी पडलो’ अशी खंत व्यक्त करत त्यांनी या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आमदार चव्हाण म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते, एवढी वर्षे ज्यांनी पक्षात काम केले असे काम करणारे कार्यकर्ते सोडून जातात. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होत आहे. तर भारतीय जनता पक्ष ते का सोडून चालले आहेत, याचे कारण त्यांनाच माहीत असावे. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख वाटते की आम्ही कुठे तरी कमी पडलो की काय ? अशी खंतही आमदार चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शिवसेना प्रवेश करणाऱ्या या नगरसेवकांना शुभेच्छाही दिल्या.

https://twitter.com/cjournalist4/status/1462792845337583622?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *