डोंबिवली : मिलापनगर मधील गणेश विसर्जन तलाव मध्ये व आजूबाजूच्या परिसरात नागरिकांकडून निर्माल्य, कचरा इत्यादी टाकले जात असल्याने तलावाचा परिसर निर्माल्य/कचरा यांनी भरला आहे. त्यामुळे तलाव परिसर स्वच्छ कधी होणार ? असा सवाल मिलापनगरवासिय विचारीत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मा. हरित लवादाच्या आदेशानुसार येथील मूर्ती विसर्जन बंद आहे. परंतु दसऱ्याचा दिवशी काही भाविक देवींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मिलापनगर मधील या तलावावर आले होते. स्थानिक रहिवाशांनी त्यांना या तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी असल्याची माहिती दिली असता ते परत गेले. सदर तलावावर महापालिकेकडून मूर्ती विसर्जन बंदी व निर्माल्य बाबत एखादा फलक सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी लावणे आवश्यक होते. येथील अनेक रहिवाशांनी सदर तलावावर पडलेला निर्माल्य, कचरा याबाबत तक्रारी महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडे केल्या आहेत पण अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सदर तलावाचे मागील वर्षी सुशोभीकरण करण्यात आले होते. या तलावात मासे, कासव इत्यादी जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मिलापनगर तलाव परिसर स्वच्छ, निर्जंतुक, कचरामुक्त राहावा अशी मागणी मिलापनगरवासियांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *