डोंबिवली : कोवीडवर मात करण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा पर्याय आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला अटकाव घालण्यासाठी गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण होऊ शकेल अशी मागणी डोंबिवली युवासेनेचे उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी गणेशोत्सव सुरू केला. लोकमान्यांचा वारसा सांगणाऱ्या या गणेशोत्सवाने वैचारिक व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशी परंपरा कायम ठेवली आहे. गेल्यावर्षी कोरोना संक्रमणामुळे गणेशोत्सव एकत्रीत साजरा करता आला नाही. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधही शिथिल झाले आहेत. साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. केावीडवर मात करण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा पर्याय आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लसींचा केंद्राकडून अपुरा पुरवठा केला जात असल्यामुळे आजही अनेक नागरिक लसीच्या पहिल्या डोस पासून वंचित आहेत. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळास लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिल्यास प्रत्येक प्रभागातील नागरिकांनाही सोयीचे होऊन तसेच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. लसीकरणाचा वेग वाढवून आरोग्य सेवकांचा भारही कमी होईल याकडे म्हात्रे यांनी मुख्यमंत्रयाचे लक्ष वेधले आहे. तसेच त्यासाठी लागणारा लस साठाही महापालिका प्रशासनास उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *