बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. २७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा ११ सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकूल येथे आयोजित ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. बल्लारपूर येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भारतात घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूरमधून मिशन ऑलिम्पिक ची सुरवात झाली असून सन २०३६ मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू नक्कीच पदक मिळवतील, असा आशावाद सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास १५५१ खेळाडू दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *