ठाणे जिल्हा विकासाच्या केंद्रस्थानी  : पालकमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र दिनी ठाणे येथे ध्वजारोहण सोहळा संपन्न 

ठाणे  : गेल्या तीन साडेतीन वर्षांत ठाणे जिल्ह्याने विकासाचा अनुशेष वेगाने भरून काढण्यास सुरुवात केली असून विविध प्रकल्पांमुळे आपला जिल्हा विकासाच्या केंद्रस्थानी आला आहे असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ५८ व्या  वर्धापनदिनानिमित्त त्याच्या हस्ते येथील साकेत मैदानावर  ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान केलेल्या १०७  हुतात्म्यांना वंदन केले.

*वीर पत्नींना मोफत बस प्रवास*

याप्रसंगी पालकमंत्री यांच्या हस्ते शहीद जवानांच्या ५ वीर पत्नींना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून आजीवन मोफत प्रवास सवलतीचा पास देण्यात आला. श्रीमती सुप्रिया सुधीर आंब्रे, सुनीता रघुनाथ पवार, सुनीता सुमेध राजगुरू, सुमन शंकरराव शिंदे, सत्य राणा या वीर पत्नीना हे पासेस देण्यात आले.

याप्रसंगी लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त परम बीर सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, पोलीस उप अधीक्षक प्रशांत कदम, पोलीस सह आयुक्त मधुकर पांडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात मेट्रो, समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे सुरु असून आता लवकरच धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो लोकांच्या दृष्टीने महत्वाच्या अशा क्लस्टर योजनेचे भूमिपूजन देखील होणार आहे. याशिवाय जलवाहतूकीच्या टप्प्याला पण मंजुरी मिळाली आहे. रेल्वेच्या सुविधाही वाढताहेत. जिल्ह्यात ५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार  योजना धडाक्यात राबविण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गाळ काढण्याची  कामे सुरु आहेत. पिक कर्ज वाटप अधिक वेगाने व्हावे तसेच  पिक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहचावा.  शेतकऱ्यांचा शेतमाल थेट शहरांमध्ये कसा विकला जाईल, त्यांना उत्पादनाची नवी तंत्रे शिकविण्यापासून निर्यातक्षम बनविण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशा सुचना मी दिल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात भाजीपाला लागवडीसाठी १० हजार हेक्टरचे उद्दिष्ट्य ठेवले आहे असे सांगून त्यांनी कृषी क्षेत्राला देखील प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून १ हजार ६७ कोटी रुपये कर्जवाटप केल्याने अनेकाना व्यवसाय सुरु करणे शक्य झाल्याचे ते म्हणाले.

*लोकप्रतिनिधींचेही सहकार्य*

जिल्ह्यात आजपासून तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा देण्यात येत आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानचा शुभारंभ देखील होत आहे. सर्व शासकीय व निमशासकीय  कामासाठी तो ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय स्तरावरील नामांकन मिळाल्याबद्धल आरोग्य यंत्रणांचे अभिनंदन केले. विविध मोठ्या आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास लावून आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा बिमोड केल्याबद्धल पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्त यांचे अभिनंदन केले. शहरात स्मार्ट सिटीज अंतर्गत कामे सुरु असून आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने हे होत आहे असेही ते म्हणाले.यावेळी पालकमंत्री यांनी पोलीस परेडची पाहणी केली तसेच उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

*रस्ता सुरक्षा सप्ताहाचा संदेश*

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रादेशिक परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा संदेश देणाऱ्या मोठ्या आकाराच्या फुग्याचे अनावरण करण्यात आले. तसेच नो हॉकिंग- नो हॉर्न आणि हेल्मेट वापरा असा कलात्मक आणि नाविन्यपूर्ण संदेश देणाऱ्या कलाकृती देखील पहिल्या व त्याचे कौतुक केले.  पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, पोलीस हवालदार राजेंद्र चासकर, पोलीस नाईक कैलास नथू पाटील यांनी ते स्वीकारले.

**

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *